---Advertisement---
जळगाव : शहरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांविरोधात सनातन संस्था आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने स्टेडियम चौक येथे गुरुवारी (२१ ऑगस्ट) रोजी आंदोलन करण्यात आले. पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भगवा आतंकवाद’ ऐवजी ‘सनातनी आतंकवाद’ किंवा ‘हिंदुत्ववादी आतंकवाद’ असे शब्द वापरण्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही विधाने हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी आणि सामाजिक शांतता भंग करणारी असल्याचा आरोप करत, आंदोलकांनी चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.
या आंदोलनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, रणरागिणी समिती, राष्ट्र भक्त अधिवक्ता समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, स्वामीनारायण संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वीर बाजीप्रभु गणेश मंडळ, श्री महाबली ढोल पथक, हिंदू महासभा, अधिवक्ता संघ, सकल हिंदू समाज आदी अनेक हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांचे 200 हून अधिक साधक धर्मप्रेमी बांधव उपस्थित होते.
समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी सांगितले की, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. मालेगाव प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांच्या टीममधील तत्कालीन पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावर यांनी केलेल्या खुलाश्यांचा संदर्भ देत तपास अधिकाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आरोपी बनवण्यासाठी दबाव आणला गेला होता. या प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटले असल्याने, तत्कालीन राज्याचे प्रमुख म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांची यातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच स्वामीनारायण मंदिराचे नयन स्वामी, श्री शिवप्रतिष्ठानचे गणेश पाटील सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, सनातन संस्थेचे वसंत पाटील, योग वेदांत सेवा समितीचे अनिल चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, अधिवक्ता निरंजन चौधरी, अधिवक्ता राहुल अकोलकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आकाश फडे यांनी आंदोलकाना संबोधित केले.
---Advertisement---

आंदोलकांनी यावेळी सनातन संस्थेवर वारंवार होत असलेल्या आरोपांवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी विजय ढगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानांची सखोल चौकशी करावी. सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल करावा. भविष्यात अशा प्रकारची विधाने रोखण्यासाठी राजकीय नेत्यांसाठी स्पष्ट आचारसंहिता निश्चित करावी आदी मागणी मागण्या करण्यात आल्या.