---Advertisement---
जळगाव : अजिंठा घाटाच्या पायथ्याशी सोमवारी रात्री एका भरधाव ट्रेलरने दिलेल्या धडकेत कारचा पूर्णपणे चुराडा झाल्याची घटना घडली. या अपघातात ५८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिताली सुहास पाटील (५८, रा. विनोबानगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
जळगावातील निवृत्त कृषी अधिकारी सुहास पाटील व मिताली पाटील हे दाम्पत्य चालक योगेश बारी याच्यासह कारने (एमएच ०३, एडब्ल्यू २६६१) पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते सोमवारी जळगाव येथे घरी परत येत होते.
दरम्यान, अजिंठा लेणी टी पॉईट नजीक मागून येणाऱ्या ट्रेलरवरील (एमएच २१, बीवाय ४९१६) चालकाचे नियंत्रण सुटले व ते थेट कारवर येऊन धडकले. अपघातानंतर अजिंठा घाटात वाहतूक खोळंबली होती.
धडक एवढी जोरात होती की, कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पाटील यांचे नातेवाईक अमित माळी व अन्य जण घटनास्थळी पोहचले.
स्थानिकांच्या मदतीने ट्रेलर खालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला. सुहास पाटील व योगेश बारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी हा अपघात दिसल्यानंतर घटनास्थळीच जळगावचे डॉ. महेंद्र काबरा यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, या घटनेमुळे पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.