आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी निकोप समाजाची गरज, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

---Advertisement---

 

वृंदावन (मथुरा) : एखादी चांगली व्यक्ती व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यापूर्वी, सामान्य लोकांनी चांगले असणे आवश्यक आहे. एक मजबूत आणि आदर्श राष्ट्र उभारण्यासाठी एक चांगला समाज ही प्राथमिक अट आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

संत श्रीमलुकदासजी महाराज यांच्या ४५२ व्या जयंतीनिमित्त आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. सरसंघचालकांनी धर्म, लोकशाही, गोरक्षण आणि भारताच्या जागतिक भूमिकेवर विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, संतांचा स्वभाव पर्वतासारखा असतो. ते इतरांच्या लहानातल्या लहान सद्‌गुणांनाही मोठे करून दाखवतात.

लोकशाही आणि समाजव्यवस्थेवर ते म्हणाले की, देशाच्या लोकशाही व्यवस्थेत चांगल्या लोकांचा उदय होणे अत्यंत आवश्यक आहे. ही आपली लोकशाही आहे, त्यामुळे यात चांगले लोक आले पाहिजेत. जेव्हा मी ‘चांगले लोक’ म्हणतो, तेव्हा माझा उल्लेख कोणत्याही विशिष्ट पक्षाबद्दल किंवा व्यक्तीबद्दल नसतोः उलट, मी खऱ्या अथनि चांगल्या असलेल्या लोकांबद्दल बोलत असतो, कारण जे चांगले असतात ते नेहमीच चांगले काम करतात.

ही प्रातिनिधिक लोकशाही असल्यामुळे, आपण आपले प्रतिनिधी स्वतः निवडतो. त्यामुळे, जर आपण स्वतः वाईट राहिलो, तर आपले प्रतिनिधीसुद्धा वाईटच असतील. आपण जितके चांगले बनू, तितकेच चांगल्या लोकांना सर्वोच्च पदावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

गोरक्षण आणि जनजागृती

समाजात गोरक्षण आणि जनजागृतीच्या गरजेवर सरसंघचालक म्हणाले की, केवळ एखादी व्यवस्था किंवा कायदा तयार केल्याने समस्या सुटत नाहीत. उदाहरणार्थ, लाल दिवा तेव्हाच काम करतो जेव्हा लोक त्याचे पालन करतात. खरी शक्ती व्यवस्थेत नाही, तर समाजात आहे. सत्ताधाऱ्यांची गाईंचे संरक्षण करण्याची इच्छा आहे, परंतु कोणतेही धाडसी पाऊल उचलण्यापूर्वी समाजात याबद्दल व्यापक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. खरे कार्य जनजागृती करणे हे आहे. जर लोकांची भावना प्रबळ असेल, तर व्यवस्थेने ते स्वीकारलेच पाहिजे. समाजाला गोपूजक बनवा म्हणजे गोहत्या आपोआप थांबतील. सध्याच्या वैज्ञानिक युगातील गाईबद्दलच्या दृष्टिकोनाबाबत सरसंघचालक म्हणाले, आपण गाय आपली माता आहे या श्रद्धेपुरते स्वतःला मर्यादित ठेवू नये, तर विज्ञानाच्या आधारावर तिचे महत्त्व प्रस्थापित केले पाहिजे.

धर्म आणि करुणा

धर्माच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी, सर्वप्रथम स्वतःमधील अहंकाराचा नाश केला पाहिजे. धर्माला चार आधारस्तंभआहेत: सत्य, करुणा, पवित्रता आणि वैराग्य. यापैकी करुणा सर्वांत आवश्यक आहे. कारण करुणेविना धर्माची कल्पनाच करता येत नाही. हे विश्व निरंतर अस्तित्वात राहिले पाहिजे, या कल्पनेतून धर्माचा उगम झाला. विश्वाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी, आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. हेच धर्माचे मूळ स्वरूप आहे, असेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---