---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या घटनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध नोंदविण्यात आला.
शेतकरी आधीच वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात व्यापाऱ्यांच्या धोरणांमुळे शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा अमानुष असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी ठाम मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या मागणीवर प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, जयदीप पाटील, अरुण पाटील, प्रेमराज राठोड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









