---Advertisement---
जवानांना आयईडी विरोधातील कौशल्याचे धडे देण्यासासाठी सुरक्षा दल शरण आलेल्या तज्ज्ञ माओवाद्यांचा वापर करून घेणार आहे. यामुळे सुरक्षा दलाची कार्यक्षमता वाढेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. मागील चार दशकांपासून माओवादाचा प्रभाव अशलेल्या बस्तर क्षेत्र ३१ मार्च रोजी सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानंतर ही रणनीती समोर आली आहे.
शरणागत माओवाद्यांच्या कौशल्याचा वापर करून बस्तरमधील आयईडी शोधून ते नष्ट करणे सुरक्षा दलांना सोपे होणार आहे. त्यामुळे हे
पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या भागात माओवाद्यांचा प्रभाव असताना पेरून ठेवेले आयईडी शोधून त्याच्या धोक्यापासून स्थानिक तसेच सुरक्षा दलाच्या जवानांनाही वाचवणे शक्य होईल. कांकेर जिल्ह्यातील दहशतवादविरोधी आणि जंगल युद्ध महाविद्यालयातील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मदत करण्यासाठी जवळपास २० माजी माओवाद्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी अनेकांना आयईडी हाताळण्याचा आणि त्यांचा वापर करण्याचा यापूर्वीचा अनुभव आहे, अशी माहिती बस्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
अशा उपकरणांची दाट जंगलातील प्रदेशात कशा प्रकारची जुळणी केली जाते, ती कशी लवपली जातात आणि कशी कार्यान्वित केली जातात, याविषयीचे प्रत्यक्ष क्षेत्रातील व व्यावहारिक ज्ञान सामायिक करण्यावर त्यांची भूमिका केंद्रित असेल. नागरी सुरक्षा सर्वोच्च प्राधान्याने जपत, सुरक्षा दलांची कार्यक्षमता वाढवणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मसमर्पण केलेल्या कार्यकर्त्यांच्या अनुभवांचा वापर करून या उपकरणांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यांना निष्प्रभकरणे, याद्वारे हा प्रदेश आयईडीच्या धोक्यांपासून मुक्त करणे हा या प्रयत्नांचा उद्देश आहे, असे सुंदरराज यांनी सांगितले. निवडलेल्या अनेकांनी माओवादी गटांमध्ये आयईडी हाताळणी आणि प्रशिक्षणात प्रमुख कार्यकारी भूमिका बजावल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
धोके कमी करण्यासाठी कार्यक्रम
हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ शोध घेण्याची आणि निकामी करण्याची क्षमता बळकट करण्यासाठीच नव्हे, तर आयईडी पेरलेल्या दुर्गम व वनक्षेत्रांमधील धोके कमी करण्यासाठी आणि स्थानिक जनतेचे प्राण व मालमत्ता सुरक्षित राखण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे सुंदरराज यांनी सांगितले.









