---Advertisement---
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात ‘बहुजन व्हॉलंटियर फोर्स’ (BVF) तर्फे भव्य आणि शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा आणि विविध सहयोगी संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.
सकाळी ९ वाजता बिग बाजार (खानदेश मॉल) येथून या संचलनाला सुरुवात झाली. खानदेश प्रभारी सुनील सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीने गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा मार्गे रेल्वे स्थानक परिसर गाठत डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत प्रस्थान केले. पांढऱ्या गणवेशातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथसंचलन हे नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.
यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राजकुमार गवळी, संजय विसपुते, अशोक शिरसाटे, शैफुल्लाभाई खान, देवराज वाडे, सखुबाई जाधव, शोभाताई भालेराव, प्रा. मीनाक्षी वाघमारे तसेच प्रा. डॉ. प्रकाश कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या पथसंचलनाचे नियोजन बीव्हीएफचे राज्य प्रभारी प्रकाश इंगळे आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सहसंयोजक सुमित्र अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संचलनात शुद्धोधन खंडारे, गोविंदा इंगळे, संजीव सोनवणे, माया खंदारे, उज्ज्वला इंगळे आणि देवानंद निकम यांनी नेतृत्व केले.
या वेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो स्त्री-पुरुष कार्यकर्ते निळ्या झेंड्यांसह सहभागी झाले होते. ‘जयभीम’च्या घोषणांनी आणि शिस्तबद्ध संचलनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.









