न्यूयॉर्क : २६ जून काश्मिरात मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आमसभेत वार्षिक अहवालावर चर्चा करताना केला. यावर संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी पाकिस्तानच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देत, महासभेत महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चेत पाकिस्तानी प्रतिनिधी काश्मीरची बदनामी करून वेळ वाया घालवत असल्याचे म्हटले.
पाकिस्तानातील विदारक परिस्थिती समोर आणल्यास तुम्हाला कठीण जाईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. माधूर महासभेला संबोधित करताना म्हणाले, पाकिस्तानी राजदूतांचे काश्मीसंदर्भातील आरोप निराधार व द्वेषभावनेतून केले आहे. पाकिस्तान या मंचाचा गैरवापर करीत असून, आम्ही त्याचा निषेध करतो. सभेत महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा होत असताना काश्मीरवर बोलण्याची गरज नव्हती. ही पहिली वेळ नसून यापूर्वीही पाकिस्तानकडून खोडसळपणा करण्याचा प्रकार घडला आहे. व्याप्त काश्मिरातील नागरिकांवर पोलिस व सुरक्षा दलाकडून अमानुष अत्याचार केला जात आहे. आम्ही त्याचा तपशील समोर आणल्यास तुम्हाला कठीण जाईल, असा इशारा माधूर यांनी दिला.
खोडसाळपणा सहन करणार नाही
माधूर म्हणाले, काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तेथील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. या प्रदेशासंदर्भात पाकिस्तानला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या देशातील परिस्थितीवर लक्ष द्यावे. संयुक्त राष्ट्रात चर्चेचा विषय कुठलाही असो काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तान नेहमीच दिशाभूल व बदनामी करतो. असा खोडसाळपणा भारत सहन करणार नाही.
सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा काळाची गरज : भारत
पुढील वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेला ८० वर्षे पूर्ण होत असून, या पृष्ठभूमीवर सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची भूमिका भारताने घेतली. सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावर चर्चा करताना प्रतीक माथूर म्हणाले की, सुरक्षा परिषदेत सर्व देशांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. काही देशांची मक्तेदारी संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे.