Jalgaon Weather: उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागत्या असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात आजपासून ते २० एप्रिलपर्यंत हवामानात बदल पाहायला मिळणार आहेत.
वातावरणातील होणाऱ्या बदलांमुळे सध्या पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यंदा मार्च म हिन्यापासूनच अनेक भागांत तापमान वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला. सकाळी ११ वाजत नाहीत तोच उन्हाचे चटके अंगाला बसत आहेत. दुपारी शहरातील रस्त्यांवर कर्फ्यूसदृश स्थिती बघायला मिळत आहे. अशात पुन्हा जळगाव जिल्ह्यात १७ एप्रिलपासून ते २० एप्रिलपर्यंत हवामानात बदलाची स्थिती पाहायला मिळणार आहे. अर्थात पारा ४३ अंशांपर्यंत पोहोचून उष्णतेची लाट जाणवेल तर दुसऱ्या बाजूला काही दिवस ढगाळ वातावरण आणि सायंकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे.
जिल्ह्यात बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्व-आग्नेयकडील ओल्या वाऱ्यांमुळे ५० टक्के ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आजपासून ते २० एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी संध्याकाळी गडगडाटी हलक्या पावसाची
शक्यता आहे. कमाल तापमान ४१ अंश असून, आर्द्रता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम आणि गुजरातमार्गे येणाऱ्या वाऱ्यांमुळे १९ एप्रिलपासून तापमान ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वान्याचा वेगही २५ कि.मी. प्रती तास राहण्याची शक्यता आहे. तसेच २० एप्रिलला केरळच्या दिशेने वाहणारे दक्षिण-पूर्व वारे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात घराबाहेत पडताना भरपूर पाणी प्या. दिवसभरात नियमित अंतराने पाणी प्या. हलके आणि सैलसर कपडे परिधान करा. उष्ण हवामानात सुती कपडे घाला. थेट उन्हापासून बचाव करा. शक्यतो दुपारी ११ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळा. शारीरिक श्रम कमी करा, प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा. योग्य आहार, फळांचे रस, नारळपाणी, ताक यांचा समावेश आहारात करा. तसेच अधिकाधिक पाणी पिऊन शरीरातील पाणीपातळी संतुलित ठेवावी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.