शेतकऱ्यांना सरकारकडून रासायनिक खतांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, खरीप हंगाम-२०२५ च्या पार्श्वभूमीवर बाजारात खतांचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चावर होणार असत्याचे स्पष्ट दिसत आहे. तालुक्यात सुमारे २७ हजार ६०६ मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाल्याबाबतची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
खरीप हंगामासाठी कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, बाजरी, भुईमुगासह सर्व पिकांसाठी यूरिया, डीएपी तसेच विविध खतांच्या ग्रेडवी गरज असते. खत पिकांसाठी आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करूनच खते वापरावीत. जेणेकरून खते कमी लागतील, ती विस्कटून देऊ नये. पेरून द्यावीत. खते मुळांच्या कक्षेत द्यावीत.
शक्यतो खते फेकून देऊ नये, खतांचा दुरुपयोग होतो. अर्थातच, पिकांना पाहिजे त्या प्रमाणात खतांची उपलब्धता होत नाही. तण मोठ्या प्रमाणात वाढते. पेरणी यंत्राद्वारे खतांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी नांगरटीनंतरच्या सर्व मशागती व पेरण्या उताराला आडव्या कराव्यात. बांधबंदिस्ती करून घ्यावी. योग्य पद्धतीने खते वापरल्यास पिकांची वाढ योग्य होते.
खतांच्या दरात नेहमी वाढ होते. खत दरवाढीचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादनखर्चावर होतो. शेतक-यांनी खताचा योग्य पद्धतीने अभ्यास करून वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेश चौधरी यांनी केली आहे .
खत दरवाढ उत्पादनखर्च वाढवणारी
सर्व खतांवर अनुदान देण्यात आले असले, तरी बाजारातील वाढलेले दर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणारे आहेत. शासन खतांचे उत्पादन व वितरण सुरळीत राहावे यासाठी तसेच शेतकऱ्यांना अडचण न येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, खत दरवाढीचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादन खर्चावर होणार असल्याने दक्षता घेणे आवश्यक आहे.
- खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. तालुक्याला आवश्यक असलेली खते आणि बियाणी काही प्रमाणात उपलब्ध झाली असून मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. तसेच खते आणि बियाणी कंपन्यांच्या अधिकारी आणि वितरकांसोबत बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राजेश चौधरी (तालुका कृषी अधिकारी, शिरपूर पंचायत समिती)