---Advertisement---
जळगाव : रोजगाराच्या आमिषाने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेण्यात आले. त्यानंतर तिला पैसे आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरातील काही व्यक्तींना विकण्यात आले. इतकंच नव्हे तर तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी वारंवार पोलिस स्टेशनच्या फेरा मारल्या, मात्र तक्रार दाखल न झाल्याने पीडितेच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात वास्तव्याला असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही महिलांनी रोजगाराच्या आमिषाने नाशिक येथे नेले. त्यानंतर तिला अडीच लाख रुपये आणि दागिन्यांच्या बदल्यात कोल्हापूरातील काही व्यक्तींना विकण्यात आले. इतकंच नव्हे तर तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. यातून ती पाच महिन्यांची गर्भवतीदेखील झाली. मात्र, तिचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांचे घर गाठले आणि याबाबत आपबीती सांगितली.
…अन् उचलले टोकाचं पाऊल
त्यानंतर पीडितेला विकत घेणारे आणि तिच्याशी लग्न करणारे कोल्हापूरातील काही जण ‘मुलीला परत पाठवा, आमचे पैसे परत द्या’ अशी मागणी करत सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. एकीकडे मुलीसोबत घडलेला अमानुष प्रकार, दुसरीकडे आरोपींकडून येणाऱ्या धमक्या आणि त्यातच पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून पीडितेच्या वडिलाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
…तरच मृतदेह घेणार ताब्यात, कुटुंबीयांचा पवित्रा
दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे. तसेच या प्रकरणाचा सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही नातेवाईकांकडून होत आहे.