अधिवेशनादरम्यान भर सभागृहात अंबादास दानवेंकडून शिवीगाळ!

मुंबई : विधीमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला असता दानवे चांगलेच संतापले आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला.

सोमवारी, राहुल गांधींनी हिंदुंविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. याच मुद्दावरून प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली आणि त्याचवेळी दानवेंनी भर सभागृहात शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर प्रसाद लाड यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आणि अंबादास दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांचा हा हिंदू द्वेष उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? असा सवाल करत जोपर्यंत अंबादास दानवेंचे निलंबन होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.