Accident News : पिसाळलेल्या कुत्र्याचा जळगावमध्ये धुमाकूळ; सात जणांना घेतला चावा

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने शनिवारी सात जणांवर हल्ला करून चावा घेत त्यांना जखमी केल्याची  घटना घडली आहे. दरम्यान, या मोकाटआणि भटक्या कुत्र्यांना पकडण्याबाबत महानगरपालिकेला फोन केला असता, असमाधानकारक उत्तरे देण्यात आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

जळगाव शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, या कुत्र्यांच्या टोळ्याच चौका चौकात पहायला मिळत आहेत. त्याचा नाहक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांवर ही कुत्री धावून जात असतात, भुंकत अंगावर धावून जात असल्याने नागरिक, महिला ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यी भयभीत होत आहेत.

त्यातच एका पिसाळलेल्या कुत्र्याने महाबळ परिसरातील मोहन नगर येथे परिसरात शनिवार (दि ३१)  सात जणांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला. यात दोन लहान मुलाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.

मनपा आता भटक्या कुत्र्यांवर कारवाई करीत नसल्याने जिल्हा रुग्णालयात शहरातील दररोजचे ८ ते १२ जण कुत्रे चावल्याने जखमी दाखल होत आहेत.  शनिवारी मोहन नगर परिसरातील नागरिकांवर बिकट परिस्थिती उद्भवली.

यात विनोद गुजराती (वय ८) भिक्षेकरी मुलाच्या मागे एक पिसाळलेले कुत्रे लागले. त्या मुलाच्या आवाजामुळे सुरेश बाबुराव माळी (वय ६०) हे हातातील बादली घेऊन कुत्र्याला हाकलायला गेले असता त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला. यावेळी आजूबाजूचे नागरिक धावून आले. त्यांनीही कुत्र्याला हाकलले. मात्र या कुत्र्याने हरीश शंकरलाल नाथानी (वय ५०), गणेश युवराज चौधरी (वय २६), गितेश युवराज बाविस्कर (वय १३), मयूर अरुण ठाकरे ( वय २९) यांच्यासह आणखी एकाला चावा घेतला.

यावेळी इतर नागरिकांनी तत्काळ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर उपचार केले. यावेळी काहींनी महापालिकेला कुत्रा पकडण्याविषयी सांगितले. मात्र आता आम्ही कुत्रे पकडत नाही. आमचा तो विषय नाही असे असमाधानकारक उत्तर देऊन टाळले. मात्र यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.