---Advertisement---
चंद्रशेखर जोशी
मृत्यू कोणाला, कसा आणि केव्हा येईल हे कुणालाही सांगता येत नाही. त्याचे कोणतेच वेळापत्रक नसते. तो कोणत्याही क्षणी येतो. रस्ताच काय पण जलमार्ग, हवाईमार्ग एखाद्यसंगी घरातही तो येतो… याची प्रचिती इतरांच्या मृत्यूच्या घटनांवरून येते. रस्त्याने चालताना, वाहनावर असताना, अनेक जण तर काहीही चूक नसताना दुसऱ्याच्या हलगर्जीपणाने, दुर्लक्षाने बळी जातात. बघा ना, हा मृत्यूचा पाश कसा अवळला जाईल काय सांगावं…
कुणी लग्न सोहळा आटोपून घरी जात असतात, काही जण उत्तरकार्य करून परतत असतात, तर काही मुला-मुलीला भेटून परतत असताना अपघात होतो अन् होत्याचे नव्हते होते. अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दुर्दैवी वार्तेने तर मन सुन्न होते. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना. या विमानात बसलेल्या प्रत्येकाचे मन किती आनंदी असेल. प्रत्येकाच्या प्रवासाचे ध्येय वेगळे, उद्देश वेगळा. मात्र वाहन अन् मार्ग एकच. सारे प्रवासी आपापल्या नियोजित जागेवर बसलेले. विमानोड्डाणाची घोषणा होते. विमान धावपट्टीवर सरसावते. आकाशात झेपावते अन् निमिषार्धात तो कर्णकर्कश, कानठळ्या बसवणारा आवाज अन् पेटलेल्या विमानाच्या ज्वाळा परिसरावर दुःखाचे सावट पसरवतात. सारे प्रवासी जीव यात होरपळतात. आनंदाचा क्षण दुःखात परिवर्तीत होतो. प्रवासाच्या सुरुवातीचा आनंद मनात असताना पुढचा क्षण आपल्या आयुष्याचा शेवटचा असेल असा विचारही या प्रवाशांच्या मनाला शिवला नसेल.
विमानापेक्षा मनाचा वेग कितीतरी पटीने अधिक असतो… त्यांच्याही डोक्यात कितीतरी गोष्टी. विचार सुरू असतील. काही विमानातून उतरल्यावर पुढील कामांचा विचार करत असतील तर कुणी परदेशातील आपल्या आप्तेष्टांच्या भेटीचे स्वप्न रंगवत असतील. पण, दैवाचा, नशिबाचा अन् भाग्याचा फासा उलटा पडला… त्यांचे हेतू, उद्देश, योजना, कल्पना सारे सारे काळाच्या कराल दाढेत लयास गेले. क्षणात सारेच संपले… म्हणतात ना विज्ञान, तंत्रज्ञान कितीही पुढे गेले, प्रगत झाले तरी निसर्ग आणि नियतीपुढे माणूस विटाच पडतो… असाहाय्य होतो, अशा अपघाताच्या घटनांमुळे हेच लक्षात येते. त्या क्षणी या जीवांना कोणाचा आधार मिळाला? कोणते तंत्रज्ञान, विज्ञान त्यांना साहाय्यभूत ठरले. अशा घटनांबाबत, त्यांच्या तीव्रतर दुःखाच्या वेदना मांडताना शब्द सागर अपुरा पडतो. २६५ लोकांचा मृत्यू… किती अश्रू वाहिले असतील त्यांची मोजदाद कोणते गणित अन् संख्याशास्त्र मांडू शकते…? अशा वेळी भावना निःशब्द होतात… अंतःकरणात गडद शांतता… निर्माण होते. ही शांतता भयावह असते.
आपल्या शहर व परिसरातही सातत्याने अपघातांचे सत्र सुरू असते. सततच्या घटना लक्षात घेता शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण झाले. वेगवेगळ्या भागात वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपूल झाले. महामार्ग शहराच्या बाहेरून न्यावा म्हणून कामकाज सुरू आहे. हे सर्व खटाटोप लक्षात घेतले तरी अपघात कमी झाले का? तर याचे उत्तर नकारात्मकच येते. झालेले रस्ते काही ठिकाणी खचल्याचे दृश्य दिसते. परिणामी या रस्त्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत असतात. अशा अपघातांच्या कारणांचा शोध घेऊ जाता काही गोष्टी प्रकर्षान समोर येतात. पहिली म्हणजे वाहनाचा अमर्याद वेग. दुसरी रस्त्यांची दुर्दशा. तिसरी वाहनातील बिघाड… आणि चौथी पण महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कोणत्याही वाहनाचा असंवेदनशील चालक. प्रत्येक चालकाला प्रशिक्षित करण्याची गरज आहे. त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे.
आपल्या बेताल, बेफाम वेगातील वाहनाने कोणाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. कोणी बालके अनाथ होऊ शकतात. वृद्ध आई-वडिलांचा सहारा अपघातात बळी जाऊ शकतो… यासाठी वाहन मर्यादित वेगाने चालवणे अत्यंत गरजेचे आहे. गत काळातील काही अपघातांच्या घटना भयंकर तेवढ्याच थरारक ठरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरनजीक नेवासा फाट्याजवळ भीषण अपघात होऊन बोदवड येथील दोन मुले ठार झाली. ही मुले पुणे येथे क्रिकेट सामने बघायला गेली होती. पोटच्या गोळ्यांचा करुण अंत पाहून त्या माता पित्यांवर काय बितली असेल? याचा विचारही करवत नाही. मुलांना मोठे केले, त्यांच्या भविष्याची स्वप्ने पहात असताना असा दुर्दैवी घाला आला तर मन सुन्न करून जातो. जळगावातील एक दाम्पत्य दक्षिण भारतात मोठ्या आनंदाने फिरायला गेले, त्यांच्या वाहनाला अन्य मोठ्या वाहनाने धडक दिली अन् होत्याचे नव्हते झाले. दोघांचा या अपघातात मृत्यू झाला.
गेल्या आठवड्यात दुधाच्या टँकरने रिक्षाला धडक दिली, यात दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले. दोघांचे संसार उद्ध्वस्त झाले. कानळद्याचे राणे दाम्पत्य विदर्भात अपघातात ठार झाले. त्यांची मुले जखमी आहेत. त्यांचे भविष्य काय? अपघातांची ही मालिका न संपणारी आहे. चालू वर्षात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या काळात २५६ अपघात झाले आहेत. यात १७६ गंभीर अपघातांमध्ये १९२ लोक मृत्युमुखी पडले आहेत. मोठमोठे उड्डाणपूल उभारले गेले याचे कारण वाहतुकीची होणारी कोंडी टळावी, त्यातून होणारे अपघात टळावे पण तसे होताना दिसत नाही. या उड्डाणपुलांवरही अपघात होतात. रिंगरोडकडून जाणाऱ्या उड्डाणपुलावर मागे एक अपघात होऊन भरधाव वाहनाने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला चिरडले होते. अनेक अपघातांचे मूळ कारण म्हणजे वाहनांचा अमर्याद वेग. आपण कोठून जातोयं, रस्ता कसा आहे याचा विचारही ही मंडळी करताना दिसत नाही. परिणामी निष्पाप जीव जाताना दिसतात.
यावर कंट्रोल करणारी यंत्रणा कार्यरत आहे पण.. हप्ते वसुलीच्या फेऱ्यात ही मंडळी दिसते. परिणामी या घटनांना कारणीभूत ठरणान्या व्यक्तींकडे सर्रास डोळेझाक केली जाते. ज्या घरातील कर्ती व्यक्ती अशा प्रकारे अपघातात मृत्युमुखी पडते तेथील परिस्थितीचाही ही मंडळी विचार करत नसावी. शासन, प्रशासन कायदे करते पण त्यांच्या अंमलबजावणीचे काय? याकडे प्राधान्याने लक्ष दिले जावे. रुंद रस्ते अतिक्रमणांमुळे निमुळते होतात. ही परिस्थिती एवढी गंभीर आहे की बऱ्याच वेळेस या रस्त्यांवरून जाणे-येणेही शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने यावर कडक कारवाई करणे हाच एक उपाय याप्रश्नी होऊ शकतो.