पुन्हा अस्मानी संकट! सोमवारपासून चार दिवस अवकाळीचा इशारा, जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव : राज्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यातच गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

येत्या सोमवारपासून खान्देशसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महारा‌ष्ट्रात सोमवारपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारनंतर राज्याच्या उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून १६ व १७ मार्चला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

आधीच मागील काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यात आता पुन्हा अवकाळीचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

या जिल्ह्यांना इशारा
खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील १३ ते १६ मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये जळगाव, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, परभणी छत्रपती संभाजीनगर भागात पावसाची शक्यता आहे. तर १५ ते १६ मार्च दरम्यान नागपूर, सातारा, लातूर, गोंदिया, सांगली, लातूर, धाराशिव, हिंगोली, बुलडाण्यात पावसाची चिन्ह आहे.