---Advertisement---
नवी दिल्ली : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी रात्री झालेल्या हवाई हल्ल्याबाबत भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. पाकिस्तानने ओमिद व्यसनमुक्ती रुग्णालयावर केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली असून, मृतांची संख्या किमान ४०० पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा कडक शब्दांत निषेध करत, हा हल्ला ‘क्रूर’ आणि ‘भ्याड’ असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयासारख्या ठिकाणांना लष्करी लक्ष्य मानता येत नाही, त्यामुळे अशी कारवाई पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
सरकारी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १६ मार्चच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात मोठ्या संख्येने निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. पाकिस्तानकडून या कारवाईला लष्करी ऑपरेशन म्हणून सादर करण्याचा प्रयत्न होत असल्याकडेही भारताने लक्ष वेधले आहे.
Our statement on Pakistan’s cowardly targeting of Kabul Hospital
🔗 https://t.co/uYbQhhc8MC pic.twitter.com/KVEaLyBtTB
— Randhir Jaiswal (@MEAIndia) March 17, 2026
याशिवाय, या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी भारताने केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत, जखमींना लवकर बरे वाटावे अशीही भावना व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला भारताचा ठाम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.
दरम्यान, अफगाण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला असून, सुमारे २५० जण जखमी झाले आहेत. बचाव पथके घटनास्थळी कार्यरत असून, ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पाकिस्तानने मात्र हे सर्व आरोप नाकारले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काबूल आणि पूर्व अफगाणिस्तानातील कारवाईदरम्यान कोणत्याही नागरी भागांना लक्ष्य करण्यात आलेले नाही.









