देशातील मुस्लिमांनो….. CAA वरुन अमित शाह म्हणाले की

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए (CAA) लागू केल्यानंतर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं भाष्य केलं आहे. सीएएवरुन मुस्लिमांना आवाहन करत त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. विरोधक सातत्याने मुस्लिम समाजात गैरसमज पसरवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना अमित शाह म्हणाले की, सीएए मंजुर झाल्यानंतर विरोधकांनी मुस्लिम समाजाची दिशाभूल केली. CAA मुळे मुस्लिमांचे नागरिकत्व जाणार, त्यांचा मतदानाचे अधिकार हिरावून घेतला जाईल, असा गैरसमज विरोधकांनी पसरवला. पण, देशातील मुस्लिमांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. CAA हा नागरिकत्व घेण्यासाठी नसून, तो निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा कायदा आहे.’

‘सीएएद्वारे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अत्याचाराला कंटाळून भारतात आलेल्या शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि हिंदुंना नागरिकत्व दिले जाणार आहे. अनेक वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगत आहेत. त्यांना ना सरकारी नोकरी मिळते, ना ते घर खरेदी करू शकतात. काँग्रेसकडे याचे उत्तर नाही, ते फक्त व्होट बँकेचे राजकारण कत आहेत.’

‘मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, या देशातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. CAA नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेस, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि राजेंद्र बाबू इ…या सर्वांनी वचन दिले होते की आम्ही, पाकिस्तान, बांगलादेशा आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या सर्व निर्वासितांना नागरिकत्व देऊ. काँग्रेस पक्षाने ते आश्वासन पूर्ण केले नाही, ते आम्ही पूर्ण करत आहोत.