---Advertisement---
नवी दिल्ली : बुधवारी सायंकाळी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी माझ्या दालनात येऊन जसा व्यवहार केला, तसा व्यवहार लोकसभेत आजपर्यंत कधीच झाला नाही. काँग्रेस पक्षाचे काही सदस्य पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन काही तरी अनुचित करणार असल्पाची पक्की माहिती मला मिळाली होती. पंतप्रधानांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गुरुवारी दिली. तसेच या माहितीमुळे सभागृहात न येण्याची पंतप्रधानांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी कनिष्ठ सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यास कारणीभूत ठरलेल्या गोंधळाबद्दल ओम बिर्ला यांनी दुःख व्यक्त केले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी खुर्चीला घेराव घातल्यामुळे पंतप्रधानांना लोकसभेतन येण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी
सांगितले. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी लोकसभा सभागृहात गैरवर्तन केले होते आणि पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी खासदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी पूर्वमाहिती मला मिळाल्याचे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्यापासून रोखण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार निषेध केला त्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला होता. संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या कृतीला तीव्र विरोध केला होता.
दुपारी दोन वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार निशिकांत दुबे घांनी ‘एडविना अॅण्ड नेहरू’ आणि ‘द मित्रोखिन आर्काईव्ह’ यासारख्या पुस्तकांचा संदर्भ देत, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर टीका करणारी विधाने करून नवा वाद निर्माण केला होता.
अशी घटना घडली असती तर…
ऐतिहासिकदृष्ट्या राजकीय मतभेद संसदेच्या सभागृहात आणले गेलेले नाहीत. काँग्रेस पक्षाचे काही सदस्य पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाऊन एखादी
अनपेक्षित घटना घडवू शकले असते, असे बिर्ला यांनी सांगितले. अशी घटना घडली असती तर त्यामुळे देशाच्या प्रतिष्ठेला गंभीर धक्का बसला असता. म्हणूनच मी पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली होती, असे ओम बिर्ला यांनी सांगितले.
तो’ काळा डाग ठरला असता
राजकीय मतभेद सभापतींच्या कार्यालयापर्यंत आणण्याची या सभागृहाची परंपरा कधीच राहिलेली नाही. बुधवारी जे घडले, तो संसदेच्या इतिहासातील काळा डाग आहे, असे ओम बिर्ला म्हणाले.
पंतप्रधानांच्या उत्तराविनाच धन्यवाद प्रस्ताव पारित
राष्ट्रपर्तीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराविनाच हा प्रस्ताव आज लोकसभेत पारित करण्यात आला. २००४ नंतर लोकसभेत प्रथमच असा प्रसंग उदभवला. स्थगितीनंतर दुपारी १२ वाजता लोकसभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेस सदस्य अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करु लागले. बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांना सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव पारित करण्यात आला.









