…अन् पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये शिरलं एअर इंडियाचं विमान

Air India: दिल्लीवरून लंडनला निघालेल्या  एअर इंडियाच्या  विमानाबाबत एक थरारक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विमान उडाल्यानंतर  ते काही वेळातच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं, त्यानंतर या विमानाने  तातडीनं युटर्न घेतला आणि ते पुन्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झालं. यावेळी विमानातील प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात आल्यानं खळबळ उडाली होती.

अशी घडली घटना? 

एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान बोईंग 787-8 ड्रीमलाइनर फ्लाइट क्रमांक AI0111 नं गुरुवारी सकाळी 7.15 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. उड्डानानंतर काही वेळातच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच अचानक नवी दिल्लीला परतलं.या विमानानं 36 हजार फूट उंचीवरून यूटर्न घेतला आणि त्यानंतर विमान सकाळी साडेनऊ वाजता नवी दिल्ली विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं.

या बाबत एका प्रवाशानं  ट्विट केलं आहे. 

या विमानातून प्रवास करणारा प्रवासी यशवर्धन त्रिखा यानं ट्विट केलं की, एअर इंडियाच्या खराब सेवेमुळं सर्व प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. (AI0111) फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्या कारणानं AC काम करत नव्हता आणि इतर समस्या देखील होत्या. वैमानिक हवेत प्रयोग करत होता, असा आरोपही त्यानं यावेळी केला.

एअर इंडियाचं स्पष्टीकरण
प्रवाशांच्या तक्रारीला उत्तर देताना एअर इंडियानं म्हटलं की, “ऑपरेशनल कारणांमुळं विमानाला उशीर झाला. आम्हाला याची खंत आहे की उशीर होणं हे नक्कीच अस्वस्थ करणारं आहे. ऑपरेशनल कारणांमुळं फ्लाइटला उशीर झाला आहे आणि त्यामुळं होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम तत्परतेनं काम करत आहे. तथापि, आम्ही आमच्या ग्राउंड टीमला पुढील अपडेट्ससाठी प्रवाशांच्या संपर्कात राहण्याची सूचना केली आहे”, असं एअर इंडियानं सांगितलं आहे.