आजपासून भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे

तरुण भारत लाईव्ह । १० जानेवारी २०२३। खासदार डॉ. हीना गावित यांच्या सतततच्या पाठपुराव्यामुळे मुंबई सेंट्रल ते भुसावळ ही नविन प्रवासी गाडीला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. 10 जानेवारी रोजी ही प्रवासी गाडी मुंबई सेंट्रलहून सुटून सकाळी 8.33 वा. नंदुरबार तर 12 वा. भुसावळ येथे पोहचणार आहे.
या गाडीला मुंबई सेंट्रल येथे हिरवा झेंडा दाखवून 10 रोजी स्वतः खा.डॉ. हीना गावित उद्घाटन करित याच गाडीतून प्रवास करणार आहे. त्यांच्या सोबत पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित हेदेखील प्रवास करीत नंदुबारला येत आहेत.

यापूर्वी खा.डॉ. गावित यांनी खान्देश एक्सप्रेसची सुरूवात करून संपूर्ण नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची सोय केली होती. तथापि, ही गाडी आठवड्यातून फक्त तीनच दिवस होती. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पुन्हा नवीन गाडी मुंबई सेंट्रल ते भुसावळ अशी तीन दिवस ही गाडी सुरू होत आहे. रविवार, मंगळवार व शुक्रवार ही गाडी मुंबई सेंट्रलहून रात्री 11.55 वाजता सुटेल. बोरिवली, बोईसर, वापी, वलसाड, नवसारी, भेसतान, चलथान, बारडोली, व्यारा, नवापूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, पालधी, जळगांव व भुसावळ येथे पोहचेल तर सोमवार, बुधवार व शनिवारी ही ट्रेन भुसावळ येथून सायंकाळी 5.40 वाजता निघेल. प्रवाशांनी या नवीन रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा.डॉ. गावित यांनी केले आहे.