Bhusawal News : शहरात घडलेल्या दुहेरी खुनाच्या खटल्याच्या सुनावणीला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. २३ मे रोजी रात्री संशयित हेमंत भूषण श्रावणकुमार याने पत्नी आराध्या व आई सुशीलाबाई यांचा घरात खून केला होता. या घटनेत आराध्याचा भाऊ ऋषभ हादेखील गंभीर जखमी झाला होता.
या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी संशयित हेमंतला अटक करून धुळे येथील दुय्यम कारागृहात ठेवले आहे. मागील सुनावणीत त्यास सत्र न्यायाधीश एस. टी. सूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोषारोप निश्चित करून चार्ज फ्रेम केला.
पुढील सुनावणीसाठी फिर्यादी व साक्षीदारांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील नियमित सुनावणी २० जूनपासून सुरू होईल. संशयितातर्फे ॲड. सत्यनारायण आर. पाल काम पाहत आहेत.
घुसखोरीप्रकरणी पुण्याच्या दाम्पत्याच्या कोठडीत वाढ
भुसावळ दोन बांगलादेशी तरुणींना भुसावळमध्ये पकडण्यात आले होते. या गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांनी पुण्यातील कोंडवा येथील शिवनेरी भागातून पती-पत्नीच्या मुसक्या आवळल्या. या दाम्पत्याच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती पोलीस कोठडी तीन दिवसांची (२ जूनपर्यंत) वाढली. शहरातील एका लॉजमध्ये दोन तरुणी मुक्कामासाठी खोली घेण्यास आल्या.
लॉज मालकाला आधार कार्डचा संशय आला. त्यानंतर चौकशीत दोन्ही घुसखोरी करून बांगलादेशातून कोलकाता येथे आल्याचे समोर आले. तेथून मुंबईला जाताना भुसावळमध्ये उतरत्या. तानिया मुळाशीर अहमद (वय २६) व करीमा बोकुलमिया अख्तर (वय २२) अशी त्यांची नावे आहेत.
बंगालमधून पथक माघारी येणार
भारतात घुसखोरी करताना तरुर्णीना मदत करणारे मुख्य संशयित पश्चिम बंगालचे आहेत. त्यांना पकडण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एक अधिकारी व तीन हवालदारांचे पथक रवाना झाले आहे. ते रविवारी परत येऊ शकते. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी पुण्यातील कोंडवा भागातील शिवनेरी परिसरातून रंगा देवअप्पा अरकरी (वय ४५) व कुलमणी रंगा अरकरी (वय ३६) या दाम्पत्याला अटक केली. शनिवारी पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे पोलीस कोठडी २ जूनपर्यंत वाढली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, साहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागूल तपास करीत आहेत.