वीज मीटर बदलण्यासाठी लाच स्वीकारणार्‍या वीज कंपनीच्या कर्मचार्‍यास अटक

अमळनेर : बंद पडलेले वीज मीटर बदलण्यासाठी व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारणारा वीज वितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कैलास पाटील यास पाच हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 5 रोजी शहरातील क्रांती नगरात ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारली असल्याचे भरत पाटील याने सांगितले. यामुळे त्याच्यासह कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराकडील वीज मीटर गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडले होते. यामुळे तक्रारदार दरमहा सरासरी विजेचे बिल भरत होते. ही बाब तक्रारदाराने वीज कंपनी कार्यालयात निदर्शनास आणून दिली. कनिष्ठ अभियंता देशमुख यांनी या वीज मीटरची पाहणी केली.

कनिष्ठ अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरून तक्रारदारास वीज मीटर बदलविण्यासाठी 10 हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रत्यक्ष येवून 5 रोजी लेखी तक्रार दिली होती.

तक्रारदाराच्या तक्रारीवरुन अमळनेर येथे पडताळणी केली. पडताळणी दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ भरत पाटील याने तक्रारदाराकडे कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख यांच्या सांगण्याप्रमाणे पाच हजार रुपये पंचासमक्ष मागणी केली. तक्रारदाराच्या क्रांतीनगर येथील राहते घरी सापळा लावला. त्यात भरत पाटील यास तक्रारदाराकडून पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच पथकातील राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल यांनी केली.