---Advertisement---

Jalgaon News : लाडक्या विठ्ठलाचे स्वस्तात करा दर्शन; एसटी महामंडळाची खास ‘ऑफर’

---Advertisement---

जळगाव : वारकऱ्यांच्या वारीसोबत नाचत गात आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याची सर्वांनाच इच्छा असते. मात्र काही वेळा वय, आरोग्य तसेच आर्थिक विवंचनेमुळे अनेकांना हे शक्य होत नाही. त्यामुळे थेट आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर गाठत भक्तजन आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेतात. अशा भक्तांचा आपल्या विठूरायापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर व सोपा व्हावा, यासाठी राज्य एसटी महामंडळातर्फे दरवर्षीच खास नियोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ आगारांतून प्रत्येकी एक बस पंढरपूरला जाण्यासाठी सकाळी आठ वाजता सोडण्यात येत आहेत. यात महिलांसाठी ५० टक्के तर ज्येष्ठासाठी मोफत सवलत कायम असून, वारकरी भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी केले आहे.

दरवर्षी जळगाव जिल्ह्यातून हजारो भाविक आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात. काही ठिकाणी खासगी बसेस तर कधी सार्वजनिक वाहनाने हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठत असतात. बहुतांशवेळा खासगी वाहनातून जाणे खर्चिकच असते. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी राज्य एसटी महामंडळाकडून आषाढीनिमित्त पंढरपूरच्या वारीसाठी भक्तांच्या सेवेसाठी ज्यादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात येते.

प्रवाशांच्या ग्रुप बुकींग मागणीनुसार बसेस उपलब्ध

जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ आगारांतून सकाळी ८ वाजता प्रत्येकी एक अशा ११ बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येत आहेत. सध्या एकही ग्रुप बुकिंग आलेले नाही. मात्र आतापर्यंत २५ एसटी महामंडळाच्या बसेसचे बुकिंग झाले आहे. तसेच प्रवाशांनी ग्रुप बुकींगची मागणी केल्यास त्यांच्या गावातून बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही परिवहन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ग्रामपंचायतीने मागणी केल्यास गावातून बस उपलब्ध

जळगाव जिल्ह्यातूनही ११ आगारांतून पंढरपूरला जाण्यासाठी दररोज सकाळी ८ वाजता प्रत्येक आगारातून एक बस अशा ११ एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. जर एखाद्या गावातील ४० किंवा त्याहून जास्त भाविकांनी एकत्र बुकिंग केले किंवा ग्रामपंचायतीने मागणी केली तर त्यांच्यासाठी स्वस्त दरात गावातूनच बस सोडण्यात येणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी सुद्धा बससुविधा

त्याचप्रमाणे पंढरपूरला जाऊन दर्शन झाल्यानंतर या भाविकांना पुन्हा त्याच बसने आपल्या गावात सोडण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षी ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्याच्या काही दिवस आधीच बसेस सोडण्यात येत आहेत.

महिलांसाठी ५० टक्के तर ज्येष्ठासाठी मोफत सवलत कायम

गावागावातून अशा देवदर्शनासाठी महिलांचे ग्रुप अनेकदा मोठ्या संख्येने निघतात. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूला जाण्यासाठी एसटी बसचे ग्रुप बुकिंग करताना महिलांना एसटी प्रवासात परिवहन मंडळाकडून दिली जाणारी तिकीट दरात असणारी ५० टक्के सवलत कायम आहे. त्याचप्रमाणे ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत असणार आहे, अशी माहिती जळगाव जिल्हा वाहतूक विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---