---Advertisement---
CBSE Board: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. २०२६ पासून, दहावीच्या बोर्ड परीक्षा सीबीएसईकडून वर्षातून दोनदा घेतल्या जातील.
यानुसार वर्षातील पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी परीक्षा मेमध्ये घेतली जाईल. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेचे निकाल एप्रिलमध्ये जाहीर केले जातील आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षेचे निकाल जूनमध्ये जाहीर केले जातील. अशी माहिती सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली.
कधी होणार परीक्षा ?
सीबीएसईने फेब्रुवारीमध्ये तयार केलेल्या मसुद्यात असे म्हटले होते की सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान घेता येईल आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा ५ ते २० मे दरम्यान घेतल्या जातील.
दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पहिल्या परीक्षेत बसणे बंधनकारक असेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांमध्ये अभ्यासक्रम सारखाच असेल आणि संपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट केला जाईल. यासोबतच, दोन्ही परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र सारखेच असतील. तर दुसऱ्या परीक्षेद्वारे, ज्यांना गुणपत्रकात सुधारणा कराची आहे, अशा विद्यार्थ्यांना सीबीएसई संधी देऊ शकते.
कोणते गुण अंतिम मानले जातील?
जर एखाद्या विद्यार्थ्याने वर्षाच्या दोन्ही परीक्षांमध्ये भाग घेतला तर त्याचे जे गुण जास्त आहेत ते अंतिम मानले जातील. जर एखाद्याला पहिल्या परीक्षेत जास्त आणि दुसऱ्या परीक्षेत कमी गुण मिळाले तर त्याच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे गुण अंतिम मानले जाऊ शकतात.