---Advertisement---
जळगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान आहे. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचूच दिला नाही. आदिवासींच्या इतिहासापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले. इंग्रजांना आदिवासी जननायकांना केवळ अपराधी ठरवायचे होते. त्यांना माहिती होते की, या जननायकांकडून प्रेरणा घेऊन हा समाज उभा राहिला, तर आपल्याला राज्य करता येणार नाही. क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्यासह अनेक आदिवासी जननायकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
धरणगाव येथे क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व आदिवासी जननायकांचा इतिहास लिहा. प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या इतिहासाची प्रदर्शनी लावा. आदिवासी जननायकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान नव्या पिढीला कळू द्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सांगितले आहे. त्यानुसार आदिवासी जननायकांचा इतिहास पुढे आणण्याचे प्रयत्न सुरु आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
”प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं”
इंग्रजांमध्ये नोकरी करताना आदिवासींवर होणारा अन्याय पाहून क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. आदिवासी समाजाला जागृत केले आणि इंग्रजांविरुद्ध लढा सुरु केला. यामध्ये आदिवासी भगिनीदेखील लढा दिला. या लढ्यामध्ये अनेक आदिवासी बांधव-भगिनी मरण पावले. ”प्रेम कर भिल्लासारखं, बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, असे कुसुमाग्रज यांच्या कविता साखरे मेघ गाठण्याचे काम या आदिवासी जननायकांनी केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.