state children’s drama competition : बाल नाट्य स्पर्धेत बालकलाकारांनीच मांडल्या मुलांच्या समस्या

state children’s drama competition : जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेत गुरुवारी (दि.१८) बाल कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नाटकांचे सादरीकरण करून रसिकांची वाह… वाह… मिळविली. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सर्वच बाल कलाकारांनी विविध घटकातील मुलांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समोरील आव्हाने नाटकाच्या माध्यमातून मांडले.

आयडेंटीटी :

अनाथ, फुटपाथवर राहणाऱ्या, हातमजुरी करणाऱ्या परंतु, शिकण्याची जिद्द असलेल्या मुला, मुलींची व्यथा या नाटकात दाखविण्यात आली आहे. एक शिक्षक विना भिंतींच्या शाळेत त्यांना शिकवितो, त्यांना आपले नाव देवून शिक्षित करतो, नंतर ही मुले स्वकर्तुत्वाने कोणी टीसी, कोणी हॉटेल चालक तर कोणी अभिनेत्री होते. भुसावळ येथील पुंडलिक गणपत बऱ्हाटे माध्यमिक विद्यालयाने या नाटकाचे सादरीकरण केले.

शोध अस्तित्वाचा :

धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात हरवेल्या कुटुंबाची कहाणी या नाटकात दाखविण्यात आली आहे. नोकरीमुळे आई-वडील यांच्याशी चर्चा होत नाही. परिणामी मुलगा मोबाईलमधील गेमच्या आहारी जातो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज या मुलाच्या स्वप्नात येऊन त्याला समजवितात, त्याला आभासी आणि वास्तविक जगाची ओळख करून देतात तसेच मित्र बनविण्याचा आणि पुस्तके वाचण्याचा सल्ला देतात. त्यानंतर हा मुलगा यातून बाहेर पडतो व आनंदी जीवन जगू लागतो. जळगाव येथील ब. गो. शानबाग विद्यालयाने हे नाटक सादर केले.

आई मला छोटीशी बंदूक देना :

दिव्यांग मुलाची व्यथा मांडणारे हे बालनाट्य असून दिव्यांग असल्याने इतर मुले त्या मुलाला त्यांच्यासोबत खेळू देत नाहीत. त्यामुळे त्याला इतर मुलांसोबत खेळता येत नाही. परंतु, हार न मानता स्वतःच्या कल्पनाशक्तीने विविध क्लृप्त्या लढवून तो त्या मुलांशी खेळतोच. सैनिक बनण्याची त्याची इच्छा असल्याने तो आईकडे बंदूक मागतो आणि देशसेवेसाठी सैनिक होतो, असे यात दाखविण्यात आले आहे. जळगाव येथील शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाने ह नाटक सादर केले.

खेळ :

भुसावळ येथील जय गणेश फाउंडेशनने सादर केलेले हे नाटक डोंबारी जमातीवर आधारित आहे, त्यांच्या जीवनात चाललेले संघर्षमय यात्रेचे दर्शन या बालनाट्यातून घडविण्यात आले आहे. सत्य जीवनावर आधारित हे नाटक आहे.

मारुतीची जत्रा :

हे बालनाट्य तमाशा कलावंतांच्या मुलांचे भावविश्व व त्यांच्या अडचणीवर भाष्य करते. एकूणच ह्या बालनाट्यात बालमनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोपपावत चाललेल्या लोककला आणि त्यांचा कला टिकविण्यासाठीचा संघर्ष, प्रेक्षकांची उदासीनता, वाढती स्पर्धा या गोष्टींवर यात प्रकाश टाकण्यात टाकण्यात आला आहे.

म्हावरा घावलाय गो :

हे बालनाट्य आगरी कोळी भाषेचा आधार घेऊन रचण्यात आले आहे. कोळी नृत्याची आवड आणि जान असल्याने ही स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यावर आधारीत हे नाटक आहे. समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्याला मित्र भेटतात आणि त्यात एक यशस्वी नामक मैत्रिणीचा देखील समावेश असतो. ती अभ्यासात उत्तम असून तिला देखील नृत्याची आवड असते. परंतु, तिच्या वडिलांचा याला विरोध असतो. त्यामुळे यशस्वी नाराज असते.

दरम्यान, गोल्डीला एक मासा धरायचा आहे ही गोष्ट जाणल्यानंतर यशस्वी त्याला अभ्यासाच्या मदतीने तो मासा कसा धरायचा हे शिकवते आणि अखेर शाळा सोडलेल्या गोपालला शाळेत जाण्याची गोडी लागते. जळगाव येथील नाट्यरंग बहुउद्देशीय संस्थेने या नाटकाचे सादरीकरण केले.