---Advertisement---
भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादनाला सध्या मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, चीनकडून दुर्मिळ चुंबक यांच्या निर्यातीवर कडक निर्बंध लावले गेले आहेत. भारतीय वाहन उद्योगाचे यावर मोठे अवलंबित्व असून, मागील आर्थिक वर्षात भारताने रेअर अर्थ मॅग्नेटची सुमारे ८० टक्के आयात चीनमधून केली होती.
ईव्ही आणि हायब्रीड वाहनांमध्ये परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर्स’ (पीएमएसएम) वापरल्या जातात, ज्यात हे चुंबक आवश्यक असतात. या मोटर्स कमी खर्चीक असून उच्च टॉर्क आणि ऊर्जा कार्यक्षमता देतात. पारंपरिक इंजिन (आयसीई) असलेल्या वाहनांमध्येही, हे चुंबक इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगसारख्या यंत्रणांमध्ये वापरले जातात.
चीनने लागू केलेले निर्बंध
एप्रिल २०२५ मध्ये चीनने सात दुर्मिळ घटक व तयार चुंबकांच्या निर्यातीवर कडक अटी लागू केल्या. त्यानुसार, निर्यात करण्यापूर्वी स्पष्ट वापर तपशील देणे आवश्यक असून, संरक्षण क्षेत्र व अमेरिकेशी संबंधित व्यवहारांवर बंदी घातली आहे. परिणामी, चीनमध्ये आयात मंजुरी प्रक्रियेचा कालावधी ४५ दिवसांवर पोहोचला असून, यामुळे आयातीत मोठा अडथळा येत आहे.
भारतीय वाहन कंपन्यांवर परिणाम
क्रिसिल रेटिंग्जच्या माहितीनुसार, ३० पेक्षा अधिक भारतीय कंपन्यांच्या आयात विनंती भारत सरकारकडून मंजूर झाल्या आहेत, पण चीनकडून अद्याप कोणतीही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे जून २०२५ अखेरपर्यंत कोणतीही शिपमेंट भारतात पोहोचलेली नाही. देशातील अनेक कंपन्यांनी चार ते सहा आठवड्यांचा साठा करून ठेवला असला, तरी जुलै २०२५ पासून उत्पादन ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. २०२५-२६ मध्ये पॅसेंजर वाहनांची वाढ २-४ टक्के राहण्याची शक्यता आहे. मात्र, विक्रीत ३५ ते ४० टक्के वाढ अपेक्षित होती. याशिवाय, इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची वाढ २७ टक्क्यांच्या घरात अपेक्षित होती. परंतु, हे सारे अंदाज या पुरवठा अडथळ्यामुळे धोक्यात येऊ शकतात.