क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी, ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव : शुल्लक कारणांवरून हाणामारी झाल्याचा घटनांमध्ये वाढ होत असतांना अशीच घटना रावेर तालुक्यात  शुक्रवारी घडली आहे. बोकडाने तेल सांडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दोघे जखमी झाले. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून ३२ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

रावेर तालुक्यातील रसलपूरचे रहिवाशी भिका तडवी यांच्या घरातील पाच किलो तेल बोकडाने सांडले. यामुळे त्यांनी बोकडास बांधून ठेवले. या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन दंगल झाली. या दंगलीत चापटा, बुक्के, लाथा, दगड, लोखंडी पाईप, चेनव्हिल याचा वापर करण्यात आला. यात सलीम तडवी व गंभीर तडवी दोघे जखमी झाले. याबाबबत सलीम तडवी यांच्या फिर्यादीनुसार नाजीम रहेमान खाँ, फिरोज रहेमान खॉ, रिजवान खॉ यांचे सह २१ जणांविरुद्ध तर शेख निजामुद्दीन शेख कुतुबुद्दीन यांचे फिर्यादीनुसार भिका तडवी, रमजु तडवी, सलीम तडवी, हसन तडवी यांचे सह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गैर कायद्याची मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ. सतिष सानप करीत आहेत