जळगाव जिल्ह्यात 431 वनराई बंधार्‍यांची निर्मित्ती

तरुण भारत लाईव्ह । २२ फेब्रुवारी २०२३। लोकसहभागातून जळगाव जिल्ह्यात 431 वनराई बंधारे बांधण्यात आले असून यामुळेे मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता तसेच संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण होणार असल्याचा शासकीय अहवाल आहे.

सिंचनाचे क्षेत्र वाढावे, पिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासन पातळीवरून नेहमी प्रयत्न होत असतात.यासाठी बर्‍याच वेळेस लोकसहभागही घेण्यात येत असतो. काही स्वयंसेवी संस्था यासाठी पुढाकार घेऊन बंधारे बांधून देतात तर काही संस्थांचा सक्रिय सहभाग अशा कामकाजांमध्ये नेहमी असतो. यामुळे सिंचन क्षेत्र वाढण्यात मदत होते.

पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करुन बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरविणे खूप गरजेचे असून त्यासाठी वनराई बंधारे बांधणे आवश्यक आहे. वनराई बंधार्‍यातील पाण्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याकरिता, गुरांना पिण्याकरिता, कपडे धुण्याकरिता, वनराई बंधार्‍यांच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याकरिता मदत होते. तसेच वनराई बंधार्‍याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण झाले आहे. या बंधार्‍यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1227 टी.सी.एम.जलसाठा अडविला असून 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे. एका वनराई बंधार्‍याद्वारे सरसरी 2 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषि अधिकारी तथा विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली

नाशिक विभाग राज्यात प्रथम
विभागात आजपर्यंत नाशिक 3 हजार 755, धुळे 608, नंदूरबार 1 हजार 340, जळगाव 431 असे एकूण 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत. राज्यात नाशिक कृषि विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.