लोंढ्री तांडा शिवारातील थरार ; कापूस चोरांचा शेतकर्‍यांवर हल्ला, सात शेतकरी जखमी

 

पहूर : लोंढ्री तांडा ता.जामनेर येथील पाच ते सहा शेतकर्‍यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू असताना कापूस चोर टोळकीने शेतकर्‍यांवर जिवघेणा हल्ला करून आठ जणांना गंभीर जखमी केल्याची घटना दिवसा लोंढ्री तांडा ते चिंचखेडा तवा शिवारात घडली आहे. या प्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहिती नुसार गोविंद लालसिंग चव्हाण, सुदाम लालसिंग राठोड, प्रेमराज लाला राठोड, तुकडूदास भिवसिंग चव्हाण यांच्या सह लोंढ्री तांडा येथील बंजारा समाजातील शेतकर्‍यांचे शेती लोंढ्री तांडा ते चिंचखेडा तवा शिवारात शेती आहे. कापूस वेचणीची शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. हे शेतकरी आपल्या कुटुंब व मजुरांना घेऊन कापूस वेचणीला मंगळवारी शेतात आले. गोविंद लालसिंग चव्हाण यांनी कापूस वेचणीकरून शेताच्या बांधावर कापसाचे गठ्ठे ठेवले. दुपारी बाराच्या सुमारास तीन युवक दुचाकीने शेतात येऊन कापसाचे गठ्ठे उचलून घेऊन जात असलेल्या जयसिंग चव्हाण यांना आढळले. त्यांनी चोरांना रोखले. यादरम्यान चोरांनी जयसिंग चव्हाण, गोविंद चव्हाण, व बुगडीबाई चव्हाण यांना मारहाण करण्यास सुरवात केली. सुरू असलेला दांगडो पाहून शेजारील शेतकरी घटनास्थळी धाव घेऊ लागले.

याच दरम्यान २० ते २२ चोरांची टोळका हातात कोयते, कुर्‍हाड, लोखंडी सळई व फावड्याचे दांडे घेऊन दाखल झाले. व कोणालाही काही न विचारता हातातील हत्याराने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे जखमी जयसिंग भिवसिंग चव्हाण यांनी सांगितले. प्रेमराज लाला राठोड यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारल्याने, तुकडूदास भिवसिंग चव्हाण यांचा पाय मोडल्याने हे गंभीर जखमी आहे. बुगडीबाई लालसिंग चव्हाण, गोविंद लालसिंग चव्हाण, सुदाम लालसिंग चव्हाण, मनोज प्रेमराज राठोड,जयसिंग भिवसिंग चव्हाण हे जखमी असून प्रेमराज, तुकडूदास यांच्यासह चार जणांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

जयसिंग भिवसिंग चव्हाण रा.लोंढ्री तांडा यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतात हल्ला करणारे शकील तडवी, ताबिल तडवी अन्य साथीदार रा. चिंचखेडा तवा त्यांचे पूर्ण नाव माहीत नाही यांच्याविरूद्ध पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पांढर्‍या सोन्यासाठी शेतकर्‍यांचा जीव धोक्यात

कापूस वेचणीचे दिवस असून कापूस वेचणीसाठी शेतकरी वर्ग शेतांमध्ये आहे. याचाच फायदा घेऊन भर दिवसा जंगलात टोळक्याने शेतकर्‍यांवर केलेला जीवघेणा हल्ला शेतकर्‍यांना व नागरिकांना धक्कादायक आहे. टोळक्यांच्यामुसक्या वेळीच न आवरल्यास शेतकर्‍यांचा जिव पांढर्‍या सोन्यासाठी धोक्यात आला आहे
.
हल्लेखोर कॅमेर्‍यात कैद

घटनास्थळी हल्लेखोर शेतकर्‍यांना धमकावित असताना एका शेतकर्‍याने मोठ्या हुशारीने दोन हल्ले खोरांचा फोटो मोबाईलमध्ये घेतल्याने हल्लेखोर कॅमेर्‍यात कैद झाले असून हिवरखेडा तवा येथील असल्याचेही सांगितले आहे.