---Advertisement---
Crime News: जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहेत. मागील दोन दिवसात जळगाव शहरासह जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असतांना अमळनेरात ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची घटना घडली आहे.
अमळनेर शहरात एका ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून एक लाखाची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवार (२७ एप्रिल) रोजी सकाळी उघडकीस आली. अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावर रात्री दोनच्या सुमारास अनिल विलग (रा. कोनोसी जि. अहिल्यानगर) हा हायवा ट्रक घेऊन भुसावळकडून नरडाणा येथे जात होता. यावेळी शहरातील कैलास नवघरे, मोझम शेख व अन्य एक साथीसदार या तिघांनी मिळून हा ट्रक अडवला.
यातील कैलास याने ट्रकच्या कॅबिनमध्ये चढून चालकाच्या गळ्याला चाकू लावत जबरदस्तीने चालकाच्या खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर तिघांनी चालकाला धमकावून एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न मिळाल्यास तुझा खून करू अशी धमकी त्यांनी चालकाला दिली.
चालक अनिल याने ट्रक मालक स्वप्नील झिने यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. स्वप्नील यांनी या घटनेची माहिती तात्काळ अमळनेर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस पथकास घटनांसाठी पाचारण केले. पोलिस घटनास्थळी पोहचताच मोझम शेख व अन्य एक आरोपी घटनास्थवरून पसार झाले. मात्र, कैलास नवघरे हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कैलास नवघरे हा यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगत असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आला होता. २७ एप्रिल रोजी त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार होती. पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने केलेल्या या कृत्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.