जळगावकरांसाठी खुशखबर ! २६ ऑक्टोबरपासून दररोज जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू

---Advertisement---

 

जळगाव : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. २६ ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. अलायन्स एअर कंपनीच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसाठी व्यापार, उद्योग, शिक्षण, मंत्रालयीन कामकाज आणि वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते, त्यामुळे दररोज विमानसेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना केवळ दीड तासांत मुंबई गाठता येणार आहे.

याबरोबरच दोन महिन्यांपासून बंद असलेली अहमदाबाद सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरून सायंकाळी सात वाजता जळगावसाठी विमान उड्डाण घेईल आणि रात्री आठ वाजून पंचवीस मिनीटांनी जळगाव विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे जळगावहून मुंबईसाठी रात्री आठ वाजून पन्नास मिनीटांन विमान उड्डाण घेईल आणि मुंबई विमानतळावर रात्री दहा वाजून दहा मिनीटांनी पोहोचेल. सध्या २६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईहून जळगावसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. तर जळगावहुन मुंबईसाठी रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी विमानसेवा सुरू आहे. २६ ऑक्टोबरनंतर दोन्ही बाजूने दररोज विमानसेवा उपलब्ध असेल.

अवघ्या दीड तासात गाठता येणार मुंबई

विमान रद्द होण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘अलायन्स एअर’च्या मुंबई आणि अहमदाबाद विमानफेऱ्या रद्द करण्याचे प्रमाण अधिक होते. दररोज सेवा सुरू झाल्याने केवळ दीड तासात मुंबई गाठता येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---