डेंग्यूचे रुग्ण वाढले ! नागारिकांना पावसाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन

तरुण भारत : पावसाळ्यात सर्वच आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात पण जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णचे प्रमाण व संशयितांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. जानेवारी २०२३ ते २० जुलै २०२३ पर्यंतची शहरातील डेंग्यू रुग्णांच्या स्थितीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते २० जुलैपर्यंत शहरात डेंग्यूचे ४६० संशयित आढळले असून यापैकी ५२ डेंग्यू रुग्ण निष्पन्न झाले.

जानेवारीत डेंग्यूचे रुग्ण ५, संशयित ६६, फेब्रुवारीत ४ रुग्ण, संशयित ३३, मार्चमध्ये ४ रुग्ण, संशयित ३१, एप्रिलमध्ये ३ रुग्ण, संशयित ५६, मेमध्ये २ रुग्ण, संशयित ४४ होते. जूनमध्ये १५ रुग्ण होते.२० जुलैला डेंग्यू रुग्णांची संख्या १९ वर गेली आहे. जूनमध्ये ७९ संशयित तर जुलैमध्ये संशयित रुग्णांची १५१वर पोहोचली, अशी माहिती मनपा हिवताप व हत्तीरोग विभागाने दिली. पावसाचा जोर वाढला असून जागोजागी पाणी साचण्याचे प्रमाणही वाढले आहे. या परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या यासारखे कीटकजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. असे आजार होऊ नये, यादृष्टीने दक्षता, स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केले आहे. कूलर व त्याची टाकी कोरडी करून पालथी करा.

घरात व बाहेरही पाणी साचू देऊ नका

१. पाणी साठवण्याची भांडी अथवा टाकी झाकून ठेवा
२. गच्चीवरील भंगार, फ्रीजमागील ट्रे, झाडांच्या कुंड्या, निरुपयोगी वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका
३. ताप आल्यास लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा
४. स्वत:हून कुठलेही उपचार टाळा