---Advertisement---
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातून हाकलून लावण्यात आलेल्या एका पाकिस्तानी व्यक्तीवर त्याच्याच देशात खटला सुरू आहे. २५ वर्षांपासून हुसेन अहमद हा गोव्यात राहत होता. ऑपरेशन सिंदूरनंतर, त्याला पाकिस्तानला पाठविण्यात आले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हुसेन अहमद नावाचा एक व्यक्ती २५ वर्षांपासून गोव्यात राहत होता, त्याची पत्नी देखील गोव्याची रहिवासी आहे. योग्य कागदपत्रे नसत्याबद्दल पाकिस्तानात अहमदवर कारवाई केली जात आहे. तो २९ एप्रिल रोजी वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल झाला, जिथे त्याने स्वतःला पाकिस्तानी असल्याचे घोषित केले.
सीमा ओलांडल्यानंतर, पाकिस्तानी रेंजर्सनी अहमदला त्याचे कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. तथापि, त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते आणि त्याचा पाकिस्तानी पासपोर्ट कालबाह्य झाला होता. अहमदला ताब्यात घेण्यात आले. एका लाहोरमधील न्यायदंडाधिकाऱ्याने ऑगस्टमध्ये त्याचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता.
न घर का ना घाट का
पाकिस्तानात हुसेन बेकायदेशीरपणे राहत असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला आणि या प्रकरणात जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद केला. त्याने सप्टेंबरमध्ये सत्र न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला. ३० सप्टेंबर रोजी लाहोर उच्च न्यायालयात तिसरा जामीन अर्ज दाखल करण्यात आला, जो देखील फेटाळण्यात आला. न्यायालयाला सांगण्यात आले की अहमदचे ओळख पटवणारे कोणतेही नातेवाईक नाहीत. शिवाय, तो पाकिस्तानमध्ये त्याचे वास्तव्य सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्रे सादर करू शकला नाही.