जिल्ह्यात पावसाळी आपत्तीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच आपत्ती व्यवस्थापनात कुचराई करणाऱ्या विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिल्या आहेत. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (२८ मे) आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत त्या होत्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नावंदर (तळोदा), निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे (नंदुरबार), मयूर वसावे (शहादा), जिल्हा शत्यचिकित्सक के. डी. सातपुते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या की, गोमाई व प्रकाशा येथील पुलाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. गोमाई पुलावर आपत्ती घडल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्यात येईल, तसेच गोमाई पुलावरील व्यवस्थापनासाठी मोठे अवरोधक बसवूक वाहतूक वळविण्यात आल्याचे मोठे दिशादर्शक फलक तेथे लावावेत.
प्रत्येक नगरपालिका प्रशासनाने पावसाच्या पाण्याचा निचरा तत्काळ होण्यासाठी ड्रेनेज प्रणाली सुव्यवस्थित राहील यासाठी उपाययोजना कराव्यात. डेनेज साफ करण्यासाठी १०० टक्के त्यांचे मॅपिंग करून कार्यवाही करावी. आपत्तीच्या कामात काही अडचणी येत असल्यास त्या प्रशासनाच्या त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात, म्हणजे त्या त्वरित सोडविण्यात येतील.
पूरप्रवण भागात संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित करावे. तालुक्यातील प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक गावातील दोन व्यक्तींना आपत्तीचे प्रशिक्षण द्यावे. ग्रामपंचायत स्तरावर वीज प्रतिबंधक यंत्रणा उभाराव्यात. शाळा, आश्रमशाळा, निवासी यांसारख्या ठिकाणांवर पुराचे पाणी शिरून आपत्ती होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी तेथे संरक्षक भिंती आहेत किंवा नाहीत याची त्वरित खात्री करून कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त म्हणाले की, आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणारी, तसेच तापी नदीकाठावरील बाधित होणाऱ्या गावांतील सरपंच, ग्रामसेवकांना आपत्ती निवारणाचे साहित्य द्यावे. धडगाव-अक्कलकुवा रस्त्यावर दरडी कोसळत असतात. त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. प्रत्येक विभागाने आपत्तीत आपल्या विभागाला काय काय करावे लागते, याचा योग्य अभ्यास करून सतर्क राहावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी सांगितले.