चारित्र्यावर संशय : पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाला संपवलं

औरंगाबाद : शहरात खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या केली. या घटनेने औरंगाबादेत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के दांपत्य वास्तव्यास होते. मात्र, आरोपी पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या कारणाने दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. दरम्यान रविवारी रात्री पुन्हा पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर समीर मस्के यांने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आणि मुलगा निशात यांची गळा आवळून हत्या केली.

याप्रकरणी औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.