अंमली पदार्थ तस्करीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका, श्रीनगरमध्ये ‘मानस’चा आरंभ : अमित शहा

नवी दिल्ली : “अंमली पदार्थांची तस्करी नार्को टेररशी जोडली गेली आहे. अंमली पदार्थांपासून मिळणारा पैसा हा देशाच्या सुरक्षेसाठी सर्वात गंभीर धोका बनला आहे. त्यामुळे तपासयंत्रणांचे उद्दिष्ट केवळ अंमली पदार्थ आणि व्यक्तींना पकडणे नसून संपूर्ण जाळे नष्ट करण्याचे असावे,” असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी गुरुवार, दि.१८ जुलै रोजी केले.

अमित शाह यांनी शुक्रवारी विज्ञान भवन येथे नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या (एनकॉर्ड)च्या सातव्या उच्चस्तरीय बैठकीस संबोधित केले. यावेळी त्यांनी नॅशनल नार्कोटिक्स हेल्पलाइन ‘मानस’चा आरंभ करून श्रीनगरमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी)च्या झोन कार्यालयाचे उद्घाटन केले.

या बैठकीला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, “अंमली पदार्थांचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्यामुळे भावी पिढी उद्ध्वस्त होते. आता हा संपूर्ण व्यवसाय नार्को टेररशी जोडला गेला आहे आणि देशाच्या सुरक्षेला सर्वात गंभीर धोका अंमली पदार्थांच्या तस्करीमधून कमावलेला पैसा बनला आहे.

अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे आपली अर्थव्यवस्था पोकळ करण्यासाठी आर्थिक व्यवहारांचे मार्गही मजबूत झाले आहेत. अशा अनेक संघटना तयार झाल्या आहेत, ज्या केवळ औषधांची विक्रीच नाही, तर अवैध हवाला आणि करचोरीही करतात. अंमली पदार्थांची तस्करी हा आता बहुस्तरीय गुन्हा बनला आहे, ज्याचा कठोरपणे सामना केला पाहिजे,” असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.