प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी:  प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही जे बोलतो तशीच कृती करत असतो. आज गुरुजनांच्या आशीर्वादाने समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे. आयुष्यात अनेक वळणे येत असतात. मी आयुष्यात गुलाब गुरुजी सुद्धा झालो असतो. परंतु समाजकारणातून राजकारण करत आज राज्याची सेवा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी शिक्षकांचे मला सातत्याने मार्गदर्शन लाभत आले आहे. फक्त पुरस्कार मिळवणारा हा शिक्षक आदर्श नसतो तर प्रत्येक शिक्षक हा आदर्श असतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

ते पाळधी ता. धरणगाव येथील गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्यात बोलत होते.

शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यातील समाजभान जागृत करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होईल. हे करत असताना शिक्षकांनी स्वाभिमानी पिढी निर्माण होण्यासाठी संस्कारांचे बिजारोपणही करायला हवे. असे आवाहन व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी केले.

याप्रसंगी जळगाव तालुक्यातील 858 व धरणगाव तालुक्यातील 793 अशा 1651 शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  यात प्रातीनिधिकी स्वरूपात 40 शिक्षकांना व्याख्याते गणेश शिंदे व पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गट शिक्षणाधिकारी सौ.भावना भोसले, सरला पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, विविध शिक्षक संघटनेचे राधेश्याम पाटील, ग स चे ज्ञानेश्वर सोनवणे, नरेंद्र सपकाळे, मनोज माळी, जे के पाटील, धनराज मनोरे, नाना पाटील, शरद पाटील, श्रीपाद पाटील, शितल सोनार, राजेंद्र डॉ. मिलिंद बागुल, डॉ. विजय बागुल, नरेंद्र सपकाळे , कैलास वाघ, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जनाआप्पा कोळी, सचिन पवार, मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, अरविंद मानकरी, कैलास पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षिका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक तथा जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ‘शिक्षक सन्मान सोहळा’ बाबतचे महत्त्व विशद करून गुरुजनाविषयी आदर व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. भूषण पाटील यांनी केले तर नाना पाटील सर यांनी मानले.