Madhya Pradesh : काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रामनिवास रावतांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

भोपाल  : मध्य प्रदेशातून पहाटे एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या रामनिवास रावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रामनिवास रावत हे श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर विधानसभेचे आमदार आहेत आणि ते ओबीसी समाजाचे मोठे नेते मानले जातात.

रामनिवास रावत विजयपूर मतदारसंघातून सहा वेळा आमदार राहिले आहेत आणि यापूर्वी दिग्विजय सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या विरोधात त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे.

रामनिवास रावत यांची गणना ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते. हायकमांडकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ते काँग्रेसवर नाराज झाले. त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही केले नाही, हेही त्यांच्या नाराजीचे महत्त्वाचे कारण होते. याशिवाय राज्यात कमलनाथ सरकार असतानाही त्यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते.

30 एप्रिल रोजी एका जाहीर सभेत रामनिवास रावत यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व स्वीकारले. काँग्रेससाठी ही धक्कादायक बातमी होती. रविवारी रामनिवास रावत यांनी भागवत कथेसाठी कलश यात्रेचे आयोजन केले होते जी 7 दिवस चालली होती. यानंतर सीएम हाऊसच्या कॉलवर ते भोपाळला रवाना झाले.