दुर्दैवी ! रुळ ओलांडताना एक्सप्रेस आली अन्… घटनेनं हळहळ

जळगाव : शेतात निघालेल्या ३६ वर्षीय महिलेला धावत्या रेल्वेने जबर धक्का दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १६ रोजी सकाळी ८.३० वाजता आसोदा रेल्वे गेट जवळ घडली. अलका विजय कोळी (३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड जळगाव ) असे मयत महिलेचे नाव आहे.

जळगाव शहरातील आसोदा रोडवरील श्रीराम चौकात अलका कोळी या महिला आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत तर अलका कोळी ह्या शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवार, १६ रोजी सकाळी ८.३० वाजता शेतात जाण्यासाठी इतर महिला मजुरांसोबत निघाल्या. आसोदा रेल्वे गेट जवळ रेल्वेरूळ ओलांडताना अचानक धावत्या रेल्वेच्या त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शानिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती विजय कोळी, मुलगी जागृती आणि मुलगा कार्तिक असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.