भारनियमनाने त्रस्त शेतकर्‍याचे महावितरण कार्यालयाच्या दारात ‘झोपा काढा’ आंदोलन

जळगाव : शहरातील तापमान मागील ३ दिवसांपासून वाढले आहे. वाढत्या उष्णेतने नागरिक त्रस्त झाले असून बचावासाठी विजेचा वापरात वाढ झाली आहे. या वाढीव विजेच्या मागणीमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त भाराची समस्या कमी करण्यासाठी रोज रात्री फिडरनिहाय दीड तास भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिकांसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा लोड शेडींगमुळे बंद करण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ चोपडा येथील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीजवितरण कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन पुकारले आहे. शेती पिकाला पाण्याची आवश्यकता असतांना वीज पुरवठा केला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विजेची वाढती मागणी वीज वितरणकडून पूर्ण होत नसल्याने वीज वितरण कंपनीकडून अनेक ठिकाणी लोड शेडिंग करत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याचा परिणाम म्हणून पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अंवरदे गावातील शेतकरी उर्वेश साळुंखे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी केली आहे. यामागणीसाठी गावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या दारातच झोपा काढ आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, जळगावमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यावर लोक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत. अनेक वीज उपकेंद्रावरही नागरिक धडक देत आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन महावितरणने एक तातडीची बैठक बोलावून तात्पुरत्या भारनियमानाचा निर्णय घेतला आहे. महावितरण जळगावचे शहर कार्यकारी अभियंता जयंत चोपडे म्हणाले की, अतिरिक्त वीजभार होत असल्यामुळे रात्री एक ते दीड तास तात्पुरते भारनियमन होईल. मात्र, ते गरजेनुसार केले जाईल. ज्या भागात अतिरिक्त वीजभार होत आहे, अशा भागात भार कमी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.