मुंबई : ज्या मतांच्या जीवावर इंडी आघाडीला थोड्या थोडक्या जागा मिळाल्या, ती ‘व्होट बँक’ नाराज होण्याच्या भीतीने राहुल गांधी आणि शरद पवारांनी पंढरपूरची वारी टाळली, असा घणाघात भाजपने केला आहे. तसेच वारीतल्या भगव्या पताक्यांचा त्यांना इतका द्वेष का, असा सवालही ‘एक्स’च्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
“यापूर्वी विठुरायाची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधींने वारीचे निमंत्रण स्वीकारून देखील तो सहभागी झाला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला. हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो, अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली, मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत, येऱ्यागबाळ्याचे काम नोहे…”, असा चिमटाही भाजपने काढला आहे.
वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी, तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या, मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता, असा हल्लाबोल भाजपने ‘एक्स’च्या माध्यमातून केला आहे.