भगदरीत शेतातील धान्याला आग; लाखोंचे नुकसान

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील कापलेले पिक शेतातील खळयात रचून ठेवले आहे. मात्र, भगदरी (ता.अक्कलकुवा) येथे शेतातील खळयात ठेवलेल्या पिकांना अचानक आग लागून सर्व धान्य जळून खाक झाले. ही घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली, यात पाच ते सहा शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पर्यायी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शेतकर्‍यांचे मागील हंगामातील हाताशी आलेले उत्पन्न पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. त्यामुळे भगदरी गावांतील या घटनेने शेतकरी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. वर्षभर राबराब राबणार्‍या शेतकरी राजाचे उत्पन्न काही मिनिटांतच जळून खाक झाल्याने या चार ते पाच कुटुंबातील व्यक्तीला खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तालुक्यातील भगदरी गावांतील डोंगरफळी येथील प्रताप वसावे, गोवा वसावे, भरत वसावे, ओंमदया वसावे यांनी आपला खरीप हंगामातील पीक हे आपल्या गावातील शेतातच खळे करून रचून ठेवले होते. मात्र, आज तीन वाजेच्या सुमारास अचानक खळ्यातील पिकाला आग लागली.  आपल्या खळ्यातील पिकाला आग लागली असल्याचे समजताच ते त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला, मात्र आग पूर्ण लागल्याने ती विझवता आली नसल्याने सर्व धान्य जळून खाक झाले. या शेतकर्‍यांचे खळ्यातील पीक हे मोर, बंटी, सोयाबीन आणि भात होते.

दरम्यान, या घटनेने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.