Gulabrao Patil : भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईनंतर देशभरात आनंदाचे वातावरण असून, सैन्य दलाचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दहशतवादी तळावर हल्ले करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकून कारवाई केली असती तर अधिक फायदा झाला असता, असे वक्तव्य केले. या विधानावरून ना. गुलाबराव पाटील यांनी पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी आज बुधवारी (दि.०७मे ) रोजी आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. ना. पाटील म्हणाले, नाना पटोले सारख्या माणसाने हे बोलणं योग्य नाही. पटोलेंच्या तोंडून हे शब्द शोभत नाहीत. पक्ष हा विषय वेगळा आणि देश वेगळा आहे. ज्यांच्या घरचे गेले त्यांना विचारलं पाहिजे कशावर हल्ला करावा.
आई तुळजाभवानीला साकडं
आई तुळजाभवानीने आमच्या सरकारला दहशतवाद्यांशी लढण्याचं बळ द्यावं. जे आमच्या देशाकडे काळ्या नजरेने बघतात त्यांचं तोंड कायमचं काळ करावं, असं साकडं आई तुळजाभवानीला घातल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळावं, अशी प्रार्थनादेखील त्यांनी आई तुळजाभवानीला केली.
संजय राऊतांवर साधला निशाणा
तसेच त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरदेखील प्रतिक्रिया दिली. ना. पाटील म्हणाले, संजय राऊत म्हणजे बिना आवाजाचा बाज्या, त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. संजय राऊत यांना दुसरं काही माहित नाही, दुसरं काही तरी बोलल्याशिवाय मार्केट मिळणार नाही, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.