महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबईसह कोकणातील अनेक शहरांचे तापमान झपाट्याने वाढले असून, गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्णतेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातच या भागांतील तापमान 38°C पर्यंत पोहोचले आहे.
राज्यात तापमानाचा पारा चढला
राज्यभर तापमान वाढत असून, कोकण-गोव्यात तापमान स्थिर असले तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील 24 तासांत तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मुंबई भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.
बुधवार (दि26 फेब्रुवारी) प्रमुख शहरातील तापमानाच्या नोंदी?
- मुंबई: 38°C
- नंदुरबार (शाहादा): 39.9°C (सर्वाधिक)
- धुळे: 36.5°C
- नाशिक, जळगाव: 33°C ते 36°C
- पुणे (शिवाजीनगर): 36.2°C
- लोणावळा: 37.6°C
- सातारा (महाबळेश्वर): 27.6°C (कमी तापमान)
- कोल्हापूर, सांगली: 32°C ते 35°C
- मराठवाडा: 33°C ते 37°C
राज्यात कोरडे व शुष्क हवामान असल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवत आहे. नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर जाण्याचे टाळावे, पुरेसा पाणी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.