---Advertisement---
जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्टयात काही ठिकाणी तो कोसळत आहे. जळगाव जिल्ह्यात रविवारी (१५ जून) रोजी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
---Advertisement---
तसेच हवामान खात्याने रविवारी रत्नागिरीला तर सोमवारी सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांना अंरिंज अलर्ट असून आणि मुंबईला येलो अलर्ट आहे. त्यामुळे मुंबई वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा अंदाज कायम असून, जळगाव जिल्ह्यातही रविवारी (१५ जून) रोजी जोरदार पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. तसेच कमाल तापमानात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे.
पाचोऱ्यात वादळामुळे केळी व मोसंबी बागांचे नुकसान
पाचोरा : तालुक्यात काल रात्री झालेल्या विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. तालुक्यातील बांबरूड (राणीचे) येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पीतांबर आत्माराम वाघ (वय ५०) असे मयताचे नाव आहे, तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी तसेच मोसंबी बागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बांबरूड (राणीचे) येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
गावासह शेतशिवारात मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. तसेच काही ठिकाणी पत्रे उडाली आहेत. रात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे अनेक केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबत मोसंबीच्या बागांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे.