त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही, हिंदूंच्या अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ! नितेश राणेंचा जिहाद्यांना थेट इशारा

मुंबई : तुम्ही जर हिंदूंच्या अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ, असा इशारा भाजप आमदार नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणे यांना अटक करा, या मागणीसाठी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत तिरंगा संविधान रॅली काढली आहे. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली.

नितेश राणे म्हणाले की, “आज मुंबईला जे जिहादी जमणार आहेत त्यांचा आणि तिरंग्याचा काय संबंध आहे, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं. गणेश चतुर्थीनंतर झालेल्या ईदच्या रॅलीमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवण्यात आले? हिंदूंच्या विरोधात घोषणाबाजी, मंदिरांबाहेर डीजे वाजवणे हे प्रकार कसे काय झालेत? तुम्ही जर संविधान मानत असाल तर भारतात हिंदूंची लोकसंख्या जास्त असताना इथे सर तन से जुदाच्या घोषणा कशा दिल्या जातात? या प्रश्नांची उत्तरं या जिहाद्यांनी द्यावी,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही. त्यांनी जर भगवतगीतेची १० पानं वाचली असती तर आज ही रॅली काढण्याची वेळ आली नसती. महंत रामगिरी महाराज किंवा आमच्यासारखे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदूंची बाजू लावून धरत आहेत. आम्ही अन्य कुठल्याही धर्माला काहीही बोलत नाही. त्यामुळे तुम्ही जर हिंदूंच्या अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ. ज्यावेळी गणेश चतुर्थीच्या मिरवणूकीवर मशीदीतून दगडफेक करण्यात आली त्यावेळी या लोकांनी निषेध का केला नाही?” असा सवालही राणेंनी केला आहे.