---Advertisement---

जळगावात देशातील पहिल्या रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचे उद्घाटन

---Advertisement---

जळगाव : सध्याचं युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ए.आय.चं आहे. प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात एआयचा वापर करतोच. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक शिकवा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते आसोदा येथील थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दै. तरुण भारत व सातपुडा इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


या वेळी व्यासपीठावर भैरवी पलांडे-वाघ, दै. ‌‘तरुण भारत‌’चे संपादक चंद्रशेखर जोशी, शाखा व्यवस्थापक भावना शर्मा, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, शेखर पाटील, जिल्हा परिषदेच्या विधी अधिकारी ॲड. सुरेखा पाटील, सातपुडा इन्फोटेक प्रा. लि.चे चेअरमन रितेश पाटील, डॉ. हर्षल कोतवाल टेक्निकल डायरेक्टर, कंपनीच्या सरव्यवस्थापक दीपा अग्निहोत्री, ट्रेनिंग डायरेक्टर रुची भाटिया, चेतन राजपूत, सुनील विसपुते, प्रदीप मिस्त्री, प्रशांत सपके, जिल्हा फ्रान्चिसी सविता बाविस्कर, जळगाव तालुका फ्रानचिस चंचल भाटिया आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक सातपुडा इन्फोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका आकांक्षा झोपे यांनी केले. त्यांनी कंपनी स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या सभोवताली विज्ञान आहे. त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. त्यातून त्याला नवीन संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळावं, हा आमचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना ए.आय., रोबोटिक्स, नॅनो टेक्नोलॉजी, आदी विषयांचं उत्तम प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणजे ही रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅब. भारतातील ही पहिलीच लॅब असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

या वेळी पुढे बोलताना, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आसोदा येथील थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू झालेली देशातील पहिली रोबोटिक्स कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त लॅबचा उपक्रम स्तुत्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, अशा लॅब प्रत्येक शाळेत असल्या पाहिजेत. या लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. शाळांमध्ये आता आशा प्रकारच्या लॅब निर्माण होत आहेत. यातून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल. शाळेत विज्ञानाच्या लॅबसह ए.आय. ऑटोमिशन, ऑटोमोबाइलसारख्या लॅबही असल्या पाहिजेत. थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अशा प्रकारची लॅब आहे, याचा आनंद आहे. ज्या शाळेत अशा लॅब नसतील त्यांनी मला संपर्क करावा. त्यांना लॅब स्थापन करण्यासाठी प्रशासन मदत करेल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
ज्या शाळांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी पुढील 15 दिवसात त्यांच्या शाळांचे प्रस्ताव सातपुडा इन्फोटेक प्रा. लि. कंपनीच्या जळगाव कार्यालयात दाखल करावे, असे आवाहन आयोजकांनी केले.

यावेळी थेपडे स्कूलच्या फ्रान्चिची जयश्री प्रफुल बागरेचा यांचा एक महिला स्वयंरोजगार निर्माण करणारी नारी शक्ती म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सत्कार करून महिलांच्या स्वयंरोजगाराबाबत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले.


महिला उद्योजकांना प्रोत्साहन


सातपुडा इन्फोटेकच्या संचालिका या एक महिला असल्याचा आनंद आहे. शासनदेखील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देत असून त्या दृष्टीने विविध योजना राबविल्या जात आहेत. जळगावातही महिला उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत. जळगावात महिला बचत गटांची मोठी चळवळ निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण अशा तीन लाख महिला, महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होत आहेत. आगामी काळात प्रत्येक लाडकी बहीण ही लखपतीदीदी व्हवी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रयत्नदेखील सुरू आहे.

शासकीय कार्यालयात ए.आय.चा वापर

ए.आय.विषयी पुढे बोलताना, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महसूल विभागात ए.आय.चा वापर केला जात आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे. ज्या फाईल्स बऱ्याच दिवस पडून राहत होत्या, त्यांचा वेळेत निपटारा करत कामाला गती दिली जात आहे. फक्त गतिमान शासन नाही, तर चूक मुक्त प्रशासन कसं करता येईल यावर काम सुरू आहे. सर्व शासकीय कार्यालये ई-ऑफिसमध्ये रूपांतरित केले जात आहेत. त्यामुळे शासकीय कामातील दिरंगाई दूर होत आहे. जळगाव याचे उत्तम उदाहरण आहे, असे म्हणत त्याचीच पावती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळ कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेला नाशिक विभागातील पहिला तर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार होय.
नागरिकांची कामे लवकर व्हावी यासाठी आम्ही महसूल विभागाचं एक हॅण्डबुक तयार केलं आहे. 900 पानांचं हे बुकए.आय.च्या माध्यमातून आम्ही 18 ते 19 तासात तयार केलं. या हॅण्डबुकचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यात महसूलअंतर्गत होणारी कामे आणि अर्जांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांना आपल्या कामांसाठी घरी बसून अर्ज करता येणार आहे.

विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्या

आजच्या स्मार्ट फोनच्या युगात जग जवळ आलं आहे. मोबाईलच्या सहाय्याने जळगावचा विद्याथ बिहारच्या खान सरांकडून काही गोष्टी शिकत आहे. त्याचप्रमाणे जळगावच्या शिक्षकाकडून बिहारच्या विद्यार्थ्यांनी का शिकू नये? त्यामुळे शिक्षकांनी आचार्य विनोबा भावे ॲपचा वापर करावा. त्या ठिकाणी तुमच्या कल्पना, शैक्षणिक व्हिडिओ, साहित्य त्या ॲपवर अपलोड करा. त्याचा तुम्हालाही लाभ होईल आणि विद्यार्र्थ्यांंनादेखील लाभ होईल. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा चांगली आहे. त्या ठिकाणी मुलं चांगल्या गोष्टी शिकत आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्याव्या, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

विशेषांकाचे प्रकाशन

दरम्यान, या कार्यक्रमप्रसंगी दै. ‌‘तरुण भारत‌’च्या ‌‘आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स इंटरनेट ऑफ थिंग्स रोबोटिक्स- 2025‌’ या विशेषांकाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी या विशेषांकाचे कौतुक करत या विशेषांकासारखे दर्जेदार साहित्य विद्यार्र्थ्यांंपर्यंत पोहचवा, असे आवाहन केले.

मी दै. ‌‘तरुण भारत‌’चा वाचक

मी हिंदी भाषिक असलो तरी मराठी वृत्तपत्र वाचतो. मराठी वृत्तपत्र वाचण्याची सुरुवात मी दै. तरुण भारतपासून सुरू केली. मराठी आणि हिंदी भाषेत देवनागरी लिपी वापरली जाते. सुरुवातीला मराठी कळत नव्हती, पण देवनागरी लिपी वाचता येत होती आणि ‌‘तरुण भारत‌’पासून मराठी वृत्तपत्र वाचण्याची सुरुवात झाली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

….एआयचा वापर गरजेचा -शेखर पाटील

एआय हे भविष्याचं तंत्रज्ञान नसून ते वर्तमान आहे. त्याचा अनुभव आपण घेत आहोत. एआय म्हणजे मनोरंजन नाही. भविष्यात एआयचा सर्वाधिक वापर केला जाईल. ज्यामुळे काही मनुष्यबळात जास्त काम केले जाईल. आजच्या आधुनिक युगात जे तंत्रज्ञान अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत आहे. तेच तंत्रज्ञान आपल्या ग्रामीण भागातील व्यक्तीदेखील वापरू शकतोय. त्यामुळे एआय हे कुण्या एकाचे नाही. ते सर्वांचे आणि सर्वांसाठी आहे. त्याचा वापर करा. येणाऱ्या काळात तुम्ही एआयचा वापर करणार नाही तर तुम्ही मागे राहणार. एआयमुळे नोकऱ्या सुरक्षित नाही. त्यामुळे एआयचा वापर आपल्या प्रगतीसाठी करा. एआय रॉकेट सायन्स नाही, ते शिकणे कठीण नाही, असे ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी मनोगतात सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment