India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर टीम इंडियाने अखेर आपले नाव कोरले आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 12 वर्षांनंतर ही मालिका जिंकली आहे. या पुर्वी धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने विजय मिळविला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला.
या विजयासह टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 9 महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. 2024 चा टी-20 व जिंकल्यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यासह, टीम इंडियाने 25 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने सुमारे 9 महिन्यांपूर्वी, टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्या विजयाने टीम इंडियाची भूकही वाढवली. आणि रोहितच्या संघाने पुन्हा एकदा एकही सामना न गमावता जेतेपद जिंकले.
अंतिम सामन्यात कर्णधार रोहितची फटकेबाजी
संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झाली नव्हती आणि अंतिम सामन्यांमध्ये तो अर्धशतकही करू शकला नाही. त्याच वेळी, त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ सुरूच होती. रोहित शर्माने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या आक्रमक शैलीने न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर आणले. रोहितने जलद अर्धशतक झळकावले आणि नंतर शुभमन गिलसोबत शतकी भागीदारी केली.
सामन्या दरम्यान, टीम इंडियाला येथे दोन झटपट धक्के बसले आणि शुभमन गिलनंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार रोहितही पॅव्हेलियनमध्ये परतला. येथून, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी 61 धावांची भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. श्रेयसचे अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेलही काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. त्यानंतर, राहूलने रवींद्र जडेजासह संघाला जेतेपद मिळवून दिले.
त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 10 षटकांत एक बाद 69 अशी दमदार सुरुवात केली होती. भारतीय फिरकीने मग किवींच्या आक्रमक बॅटिंगला ब्रेक लावला. रचिन रवींद्रने 29 चेंडूत 37 धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त 11 धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. मिशेलने 63 धावा आणि फिलिप्सने 34 धावा केल्या. शेवटी, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 53 धावा करत न्यूझीलंडला 251 धावांपर्यंत पोहोचवले.
या सामन्यात न्यूझीलंडचा संघाने 40 षटकांच्या अखेरीस 5 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. ही स्थिती लक्षात घेता असे वाटत होते की न्यूझीलंड जास्तीत जास्त 230 धावा करू शकेल. पण शेवटच्या10 षटकांत, न्यूझीलंडने फक्त 2 विकेट गमावल्या आणि एकूण 79 धावा केल्या. यात मायकेल ब्रेसवेलने 40 चेंडूत 53 धावा केल्या. ब्रेसवेलच्या खेळीमुळे न्यूझीलंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला. या सामन्यात चक्रवर्तीने यंग आणि ग्लेन फिलिप्सला आऊट करून 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही 2 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाजांमध्ये शमीने 1 बळी घेतला.