Jalgaon : केळी उत्पादकांना वादळासह गारपीटचा तडाखा!

 

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून हवामान विभाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशात आज जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने  वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये विविध पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड,तरोडा,रुईखेडा,ढोरमाळ,निमखेडी खुर्द आदी भागात गारपीटीमुळे कांदा व मका पीकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील काही भागात आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. तसेच काही वेळात गारपीटीला सुरुवात झाली तब्बल वीस मिनिटे गारपीट झाली. यामुळे अनेक वृक्ष कोसळले तर केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड,तरोडा,रुईखेडा,ढोरमाळ,निमखेडी खुर्द आदी भागात गारपीटीमुळे कांदा व मका पीकांचे खुप मोठे नुकसान झाल्याचे कळते. सुमारे अर्धा तासापर्यतच्या चाललेल्या या गारपीटीमुळे शेतकरी वर्ग भयभयीत झाला.

ऐन कापणीवर आलेल्या हजारो हेक्टरवरील केळीबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांवर दु:खाचा डोंगर कोसळला असुन परीसरातील अनेक शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले. पुन्हा संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले असून मेघगर्जना जोरदार सूरु आहे. यामुळे अवकाळीचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाकडुन तात्काळ पंचनामे करुन लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडुन होत आहे.