पीक स्पर्धेत जळगावच्या शेतकऱ्यांची आघाडी

जळगाव : कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांची राज्यस्तरावर, तर पाच शेतकऱ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

काय म्हणाले संभाजी ठाकूर? 
प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्यातील एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीक स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा कृषी विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली होती, असे ठाकूर यांनी सांगितले. 

या शेतकऱ्यांची निवड
पीक स्पर्धेत राज्यस्तरावर रब्बी ज्वारीमध्ये सर्वसाधारण गटात जिल्ह्यातील पिंपरखेड (ता. भडगाव) येथील प्रमोद माळी प्रथम, वरखेड (ता. भडगाव) येथील उमेश पाटील द्वितीय, तर विभागीय स्तरावर खर्चाणे (ता. जामनेर) येथील रमेश पाटील प्रथम, केकतनिंभोरा (ता. जामनेर) येथील लताबाई महाजन द्वितीय आणि सामरोद (ता. जामनेर) येथील स्वप्नील पाटील यांची तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली. हरभरा पिकात विभागीय स्तरावर सर्वसाधारण गटात कोरपावली (ता. यावल) येथील राकेश फेगडे तृतीय आणि आदिवासी गटात वाघझिरा (ता. यावल) येथील सावित्रीबाई बारेला यांची तृतीय क्रमांकाने निवड करण्यात आली.